Advertisement

वाळूचा हायवा चालू देण्यासाठी लाच

प्रजापत्र | Wednesday, 07/02/2024
बातमी शेअर करा

बीड: बीड जिल्ह्यात वाळु तस्करीला पोलीसांचेच आशीर्वाद असल्याचे लपून राहिलेले नाही. त्यातच आता वाळूचा हायवा चालू देण्यासाठी खाजगी व्यक्तीच्या माध्यमातून लाच घेतल्याप्रकरणी बीडच्या  एसीबीने स्थानिक गुन्हे शाखेच्या (LCB )  कर्मचाऱ्याच्या विरोधात गुन्हा दाखल केला आहे. एका हायवा चालकाकडून गेवराईत १५ हजाराची लाच घेण्यात आली. 

 

 

बीड जिल्ह्यात वाळूची तस्करी सर्रास सुरु आहे. यासाठी पोलीसांना देखील हप्ते असल्याचे नेहमीच बोलले जाते. त्यातच आता संगम जळगाव ता. गेवराई येथील हायवा चालकास गोदावरी पात्रातून अवैध वाळू उपसा करून शेवगाव जि. नगरमध्ये वाहतूक करण्यासाठी एलसीबीचा कर्मचारी मुकेश गुंजाळ याने १५ हजाराची लाच मागितली. सदरची लाच मुकेश गुंजाळ याच्यासाठी स्वीकारताना एसीबी अर्थात लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने गेवराईत हॉटेल साईचा मालक प्रमोद कोठेकर याला रंगेहाथ पकडले. या प्रकरणी पोलीसासह खाजगी व्यक्तीविरुध्द गेवराई पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल केला जात आहे. सदरची कारवाई सापळा अधिकारी  गुलाब बाचेवाड पोलीस निरीक्षक यांनी
 संदीप आटोळे, पोलीस अधीक्षक, ला.प्र.वि शंकर शिंदे, पोलिस उप अधीक्षक, ला.प्र.वि.बीड
यांच्या मार्गदर्शनाखाली व श्रीराम गिराम,अमोल खरसाडे, अविनाश गवळी, गणेश मेहेत्रे, अंबादास पुरी , स्नेहल कोरडे ला. प्र. वि.बीड यांच्या साहाय्याने केली. 

 

लाचेचा 'संतोष' कोणाकोणाला? 
एलसीबीच्या कर्मचाऱ्यावर लाच प्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आला असला तरी ही लाच नेमकी कोणासाठी होती. यातून नेमका कोणाकोणाला 'संतोष' मिळायचा हे देखील समोर येणे आवश्यक आहे. अनेकदा कनिष्ठ कर्मचाऱ्यांना वरिष्ठांसाठी 'बळे'च असल्या गोष्टी कराव्या लागतात आणि नंतर काही ट्रॅप झाल्यावर वरिष्ठ मात्र साळसुदपणे बाजूला राहतात, तसे तर नाही ना हे आता एसीबी शोधणार आहे का? तसेच जसे एखाद्या ठाण्यातील कर्मचाऱ्यावर एसीबीचा ट्रॅप झाला तर ठाणेदार रडारवर येतात तसे आता पोलीस अधीक्षक आणि विशेष पोलीस महानिरीक्षक एलसीबीच्या बाबतीत करणार आहेत का? 

 

Advertisement

Advertisement