Advertisement

34 पैकी बीड जिल्ह्यातील 11 कुटुंबातील वारसांना प्रत्येकी 10 लाखांची मदत

प्रजापत्र | Tuesday, 30/11/2021
बातमी शेअर करा

मुंबई दि.30 – मराठा आंदोलनात मृत्युमुखी पडलेल्यांच्या वारसांना प्रत्येकी 10 लाख रूपये रुपये देण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. राज्य सरकारच्या या निर्णयामुळे मृत्यू झालेल्यांच्या नातलगांना काही प्रमाणात दिलासा मिळणार आहे. ही रक्कम मुख्यमंत्री सहाय्यता निधीद्वारे दिली जाणार आहे. एकूण 34 कुटुंबियांसाठी मदतीची रक्कम संबंधित जिल्हाधिकाऱ्यांना देण्यात आली आहे.

 

 

आंदोलनात मृत्युमुखी पडलेल्यांच्या कुटुंबाना 10 लाख रूपये देण्याची घोषणा मागील सरकारच्या काळात करण्यात आली होती. परंतु, प्रत्यक्षात केवळ 15 कुटुंबियांना प्रत्येकी पाच लाख रूपये देण्यात आले होते. मागील सरकारचे हे आश्वासन महाविकास आघाडी सरकार पूर्ण करेल व या कुटुंबियांना राज्य शासनाकडून प्रत्येकी 10 लाख रूपये देण्यात येतील, असा शब्द मुख्यमंत्री उद्धव ठाकरे आणि मराठा आरक्षण विषयक मंत्रिमंडळ उपसमितीचे अध्यक्ष अशोक चव्हाण यांनी मराठा समन्वयकांना दिला होता. त्यानुसार मुख्यमंत्री सहाय्यता निधीतून 2 कोटी 65 लाख रूपयांचा निधी संबंधित जिल्हाधिकाऱ्यांना देण्यात आला आहे.

 

 

दरम्यान, आजवर शासनाची मदत न मिळालेल्या 19 वारसांना प्रत्येकी 10 लाख तर यापूर्वी पाच लाख रूपये मिळालेल्या 15 वारसांना प्रत्येकी आणखी पाच लाख रूपये या निधीतून दिले जाणार आहे. सरकारची आर्थिक मदत मिळणाऱ्या 34 कुटुंबामध्ये औरंगाबाद जिल्ह्यातील 6, जालना 3, बीड 11, उस्मानाबाद 2, नांदेड 2, लातूर 4, पुणे 3, तर अहमदनगर, सोलापूर आणि परभणी जिल्ह्यातील प्रत्येकी एका कुटुंबाचा समावेश आहे. मराठा समाजाच्याा मागणीनुसार हा निधी दिल्याबद्दल सार्वजनिक बांधकाम मंत्री व मराठा आरक्षण उपसमितीचे अध्यक्ष अशोक चव्हाण यांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे व उपमुख्यमंत्री अजित पवार यांचे आभार मानले आहेत.

 

Advertisement

Advertisement