Advertisement

महायुतीचा धाराशिवमध्ये दणदणीत विजय

प्रजापत्र | Tuesday, 10/02/2026
बातमी शेअर करा

धाराशिव जिल्हा परिषद व पंचायत समिती निवडणुकीत महायुतीने घवघवीत यश संपादन करत जिल्ह्यात आपली ताकद ठासून सिद्ध केली आहे. या विजयामागे राज्याचे परिवहन मंत्री तथा धाराशिव जिल्ह्याचे पालकमंत्री प्रताप सरनाईक यांची निर्णायक भूमिका ठळकपणे समोर आली आहे. निवडणूक प्रक्रियेच्या सुरुवातीपासूनच त्यांनी अत्यंत बारकाईने नियोजन करत जिल्ह्यातील प्रत्येक जिल्हा परिषद गट व पंचायत समिती गणात प्रचार सभा घेत शिवसैनिकांमध्ये नवा उत्साह संचारला.
प्रत्येक प्रचार सभेतून सरनाईक यांनी विकासाचा विश्वास देत “जिल्ह्याच्या सर्वांगीण विकासासाठी तिजोरी कायम खुली ठेवू” असा ठाम शब्द दिला. या विश्वासाच्या जोरावर त्यांनी महायुतीच्या उमेदवारांना निवडून देण्याचे आवाहन केले होते. त्याचा सकारात्मक परिणाम थेट निकालातून दिसून आला.
धाराशिव जिल्ह्यातील स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीचे संपूर्ण नियोजन पालकमंत्री प्रताप सरनाईक यांनी स्वतः लक्ष घालून केले होते. कोणत्या गटात कोणता उमेदवार, स्थानिक समीकरणे, कार्यकर्त्यांचे मनोबल, प्रचाराची दिशा – प्रत्येक बाब अत्यंत सूक्ष्मपणे हाताळली गेली. याच दूरदृष्टीचा आणि राजकीय अनुभवाचा फायदा महायुतीला मिळाला, असे राजकीय जाणकारांचे मत आहे.
या निवडणुकीत शिवसेना (शिंदे गट) ने जिल्हा परिषदेच्या एकूण 23 जागा लढवल्या होत्या. त्यापैकी तब्बल 15 जागांवर विजय मिळवत पक्षाने सुमारे 65 टक्के स्ट्राईक रेट साधला आहे. हा रेशो इतर सर्व पक्षांच्या तुलनेत अधिक असल्याने शिवसेना (शिंदे) या निवडणुकीत अव्वल ठरली आहे. हा यशाचा आलेख सरनाईक यांच्या नेतृत्वाखाली पक्षाने गाठल्याचे चित्र स्पष्ट झाले आहे.
धाराशिव जिल्हा परिषदेच्या 55 जागांपैकी भाजपने 19 जागांवर विजय मिळवत सर्वात मोठा पक्ष होण्याचा मान मिळवला आहे. महायुतीतील शिवसेना (शिंदे गट) ला 15, तर राष्ट्रवादी काँग्रेस (अजित पवार गट) ला 6 जागा मिळाल्या आहेत. दुसरीकडे शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे गट) ला 7, काँग्रेसला 3, अपक्षांना 4 आणि समाजवादी पार्टीला 1 जागा मिळाली आहे.
एकूण आकडेवारी पाहता महायुतीला 40 जागांचे स्पष्ट बहुमत मिळाले असून जिल्हा परिषदेत सत्ता स्थापन करण्याचा मार्ग मोकळा झाला आहे. महाविकास आघाडीला 10 जागांवर समाधान मानावे लागले आहे. त्यामुळे जिल्ह्यातील राजकीय वर्चस्व पुन्हा एकदा महायुतीकडे झुकल्याचे स्पष्ट झाले आहे.
या पार्श्वभूमीवर आता धाराशिव जिल्हा परिषदेचा अध्यक्ष कोण होणार, याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे. बहुमताच्या बळावर महायुती जिल्ह्याच्या कारभाराची सूत्रे हाती घेणार हे जवळपास निश्चित मानले जात असून, आगामी काळात विकासाच्या दृष्टीने कोणते निर्णय घेतले जाणार, याबाबतही उत्सुकता वाढली आहे.
एकूणच, धाराशिव जिल्ह्यातील हा विजय केवळ आकड्यांचा नसून तो नियोजन, नेतृत्व आणि विश्वासाचा विजय असल्याचे चित्र या निकालातून स्पष्टपणे समोर आले आहे
.

Advertisement

Advertisement