Advertisement

 उद्धव ठाकरेंच्या हातात शिवसेना देऊन बाळासाहेबांनी महापाप केलंय

प्रजापत्र | Tuesday, 19/03/2024
बातमी शेअर करा

हिंदुहृदयसम्राट बाळासाहेब ठाकरे यांनी शिवसेनेची सूत्रे उद्धव ठाकरे यांच्या हातात सोपवली होती. मात्र, उद्धव ठाकरे यांनी शिवसेनेचा सत्यानाश करून टाकला, अशी घणाघाती टीका शिवसेना शिंदे गटाचे कळमनुरीचे आमदार संतोष बांगर यांनी केली. बाळासाहेबांनी उद्धव ठाकरेंच्या हातात शिवसेना देऊन महापाप केलंय, असं विधान देखील संतोष बांगर यांनी केलं. 

 

आमदार संतोष बांगर यांनी आज हिंगोलीत माध्यमांसोबत संवाद साधला. यावेळी त्यांनी हे विधान केलंय. त्यांच्या या विधानामुळे मोठा वाद निर्माण होण्याची शक्यता आहे. लोकसभा निवडणूक जाहीर होताच उद्धव ठाकरेंनी प्रचारसभांचा धडाकाच लावला आहे. राज्यातील प्रत्येक जिल्ह्यांमध्ये जाऊन ठाकरे वादळी सभा घेत आहेत.  

 

 

सध्या उद्धव ठाकरे हे हिंगोली जिल्ह्याच्या दौऱ्यावर असून सोमवारी (ता. १८) त्यांनी कळमनुरी येथे जंगी सभा घेत शिंदे गटाचे आमदार संतोष बांगर यांच्यावर घणाघाती टीका केली. मी संतोष बांगर यांना विधानसभा निवडणुकीत तिकीट देऊन महापाप केलं होतं. आता या निवडणुकीत तुम्ही त्यांना धडा शिकवा, त्यांना पराभूत करा, असं आवाहन ठाकरेंनी कळमनुरी मतदारसंघातील लोकांना केलं.दरम्यान, ठाकरेंच्या या टीकेला प्रत्युत्तर देताना, हिंदुहृदयसम्राट बाळासाहेब ठाकरे यांनी उद्धव ठाकरे यांच्या हातात शिवसेना देऊन महापाप केलंय, असं विधान देखील संतोष बांगर यांनी केलं. मी त्यांच्या पक्षात असताना संतोष बांगर सारखा ढाण्या वाघ पाहिजे असे उद्धव ठाकरे म्हणायचे. सर्व जिल्हाप्रमुखांमध्ये नंबर एकचा कोणी जिल्हाप्रमुख असेल तर हिंगोलीचा संतोष बांगर असल्याचे म्हणायचे.

त्याचबरोबर दंगल झाल्यावर अन्याय होऊ नयेत म्हणून संतोष बांगर जायचा आणि त्याला मातोश्रीवर बोलावून प्रशंसा केली जायची. सोमवारी मी मुंबईत असतांना एक वयोवृद्ध आजी भेटल्या. मी शिंदेंच्या शिवसेनेत असल्याचे माहीत झाल्याने तिने माझी पाठ थोपटली, असंही संतोष बांगर म्हणाले.

Advertisement

Advertisement