मुंबई : गेले काही दिवस विश्रांती घेतल्यानंतर, महाराष्ट्रात मान्सूनने पुन्हा एकदा जोरदार हजेरी लावायला सुरुवात केलीय. राज्यातील वातावरणात सातत्याने बदल होत असून कुठे जोरदार पाऊस कोसळत आहे तर कुठं पावसानं उघडीप दिलीय. हवामान विभागाने दिलेल्या ताज्या अंदाजानुसार, ७ दिवसांत राज्याच्या विविध भागांत मुसळधार पावसाची शक्यता आहे. कोकण किनारपट्टीवर त्याचबरोबर घाटमाथ्यांवरती मुसळधार पाऊस होण्याचा अंदाज आहे.
आजपासून पुढील पाच दिवस मुंबई सह संपूर्ण कोकण, विदर्भ, खान्देश तसेच नाशिक पुणे सातारा सांगली कोल्हापूर व छत्रपती संभाजीनगर अशा २७ जिल्ह्यात मध्यम ते मुसळधार पाऊस होण्याची शक्यता आहे. तर उर्वरित मराठवाडा आणि अहिल्यानगर व सोलापूर अशा ९ जिल्ह्यात किरकोळ पाऊस होईल, अशी शक्यता आहे.बंगालच्या उपसागरात तयार झालेले हवेचे तीव्र कमी दाबाच्या क्षेत्रामुळं अरबी समुद्रातील पश्चिमी मान्सूनी वाऱ्यांना बळकटी मिळण्याची शक्यता निर्माण झाली आहे. वारे अधिक दक्षिण-वायव्येकडे सरकल्यानं ऑगस्टच्या उर्वरित शेवटच्या आठवड्यात महाराष्ट्रात पावसाची शक्यता आहे. दरम्यान राज्याच्या निम्म्यापेक्षा जास्त भागात अद्यापही दमदार पावसानं हजेरी लावली नाहीये. अनेक ठिकाणी शेतकऱ्यांच्या पेरण्या रखडल्या आहेत . तर सुरुवातीच्या काळात मुंबईस कोकण पुणे, कोल्हापूर विदर्भातील काही भागामध्ये चांगला पाऊस झाला होता. यामुळं त्या ठिकाणच्या नद्या नाल्यांना पाणी आले होते

