गेवराई - अल्पवयात लग्न करणे कायद्याने गुन्हा असतांना अनेक जण आपल्या मुलीचे कमी वयात लग्न लावून देतात. गेवराईत आज दोन मुलींचे कमी वयात लग्न होत असल्याची माहिती पोलीस व चाईल्ड लाईन यांना झाल्यानंतर हे दोन्ही बाल विवाह रोखले. पोलीस ठाण्यात वर्हाडीसह मुलींच्या माता पित्यांना बोलावून त्यांची समजूत काढली.
गेवराई शहरातील संगमित्र नगर व नागझरी याठिकाणी दोन विवाह होत होते. या दोन्ही ठिकाणी मुलीचे वय कमी होते. या घटनेची माहिती पोलीस प्रशासन आणि चाईल्ड लाईन यांना झाल्यानंतर त्यांनी आज सकाळी घटनास्थळी जावून हे दोन्ही बालविवाह रोखले. दोन्ही कडच्या वर्हाड्यासह वधु-वरांच्या माता पित्यांना बोलावून त्यांची समजूत काढण्यात आली. कमी वयात लग्न कराल तर गुन्हे दाखल करण्यात येईल असे निर्देश त्यांना देण्यात आले. ही कारवाई सहाय्यक पोलीस निरीक्षक संतोष जनजाळ, उपनिरीक्षक बोडखे, पिएसआय मनिषा लटपटे, तत्वशिल कांबळे, सारीका यादव, अश्विनी जगताप यांनी केली आहे.