Advertisement

“आता विधिमंडळात बहुमत सिद्ध करा”

प्रजापत्र | Thursday, 30/06/2022
बातमी शेअर करा

मुंबई: एकामागून एक घडलेल्या अभूतपूर्व घडामोडींनंतर अखेर शिवसेना नेते एकनाथ शिंदे  यांनी मुख्यमंत्रीपदाची तर, देवेंद्र फडणवीस  यांनी उपमुख्यमंत्रीपदाची शपथ घेतली. मात्र, यानंतर आता राज्यपाल भगत सिंह कोश्यारी यांनी नव्या सरकारला आपले बहुमत सिद्ध करण्याचे निर्देश देण्यात आले आहेत. याच पार्श्वभूमीवर शनिवार, २ जुलै रोजी विधिमंडळाचे विशेष अधिवेशन बोलावले आहे. आता नव्या सरकारला बहुमत चाचणीला सामोरे जावे लागणार आहे. 

 

 

शिवसेना नेते एकनाथ शिंदे यांच्यासह ३८ हून अधिक आमदारांनी केलेल्या मोठ्या बंडानंतर राज्यात पराकोटीचा सत्तासंघर्ष आठवडाभरापासून पाहायला मिळाला. यानंतर अखेरीस उद्धव ठाकरे यांनी मुख्यमंत्रीपद आणि विधान परिषदेच्या सदस्यत्वाचा राजीनामा दिला. यानंतर भाजप आणि शिंदे गटाने बहुमत सिद्ध करून नवीन सरकार स्थापन करणार असल्याचे जाहीर केले. यावेळी झालेल्या पत्रकार परिषदेत देवेंद्र फडणवीस यांनी एकनाथ शिंदे मुख्यमंत्री होतील, अशी मोठी घोषणा केली. यानंतर केंद्रात घडामोडी घडल्या आणि देवेंद्र फडणवीस यांनी उपमुख्यमंत्रीपदाची शपथबद्ध व्हावे, यासाठी पक्षनेतृत्वाने आदेश दिला. 

 

 

देवेंद्र फडणवीस यांनी घेतली उपमुख्यमंत्रीपदाची शपथ
वास्तविक पाहता, पत्रकार परिषदेवेळी देवेंद्र फडणवीस यांनी आपण मंत्रिमंडळाचा भाग असणार नाही. मात्र, एकनाथ शिंदे यांना लागेल ती सर्व मदत करणार असल्याचे सांगितले होते. मात्र, अवघ्या काही तासात भाजपचे राष्ट्रीय अध्यक्ष यांनी जेपी नड्डा यांनी देवेंद्र फडणवीस यांनी या नव्या मंत्रिमंडळात राहावे आणि उपमुख्यमंत्रीपद स्वीकारावे, असे निर्देश दिले. देवेंद्र फडणवीस उपमुख्यमंत्रीपद घेण्यासाठी तयार नव्हते. मात्र, खुद्द पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी देवेंद्र फडणवीस यांना एक नाही, तर दोनवेळा फोन करून उपमुख्यमंत्रीपद स्वीकारण्यासाठी आग्रह केला. अखेर पक्षादेश मान्य करून देवेंद्र फडणवीस यांनी राज्याचे उपमुख्यमंत्री म्हणून शपथ घेतली. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी ट्विट करून देवेंद्र फडणवीस यांना धन्यवाद दिले आहेत. तसेच शुभेच्छाही दिल्या आहेत. 

 

 

दरम्यान, मुख्यमंत्रीपदाची शपथ घेतल्यावर, हा बाळासाहेबांच्या विराचारांचा आणि धर्मवीर आनंद दिघे यांच्या शिकवणीचा विजय असल्याचे एकनाथ शिंदे म्हणाले. राज्याचा विकास, सर्व घटकांना न्याय देण्याचे काम केले जाईल. सर्वांना सोबत, विश्वासात घेऊन काम केले जाईल. उपमुख्यमंत्री म्हणून देवेंद्र फडणवीसही सोबत आहेत. सर्वांच्या साथीनं विकासाचा गाडा पुढे नेण्याचे काम आम्ही करू, असेही ते म्हणाले. राज्याला पुढे नेण्यासाठी, विकासाठी कायम प्रयत्न करणार असल्याचंही त्यांनी स्पष्ट केलं.
 

Advertisement

Advertisement