Advertisement

शेतकऱ्याच्या हातातली दीड लाखांची बॅग पळवली

प्रजापत्र | Monday, 31/01/2022
बातमी शेअर करा

औरंगाबादः दुचाकीवरून आलेल्या दोन भामट्यांनी शेतकऱ्याच्या हातातील  दीड लाख रुपयांची रक्कम हातोहात पळवल्याची घटना  गंगापूर तालुक्यात  घडली. विशेष म्हणजे भर दुपारी रस्त्यावर वर्दळ असताना ही घटना घडली. मागील वर्षभरात तालुक्यात गंगापूर, घरफोडी आणि चोरीच्या घटनांमध्ये वाढ झाली आहे.

 

 

दुपारी दीड वाजेच्या सुमारास चोरी
29 जानेवारी रोजी दुपारी दीड वाजेच्या सुमारास तालुक्यातील तांदुळवाडी येथील शेतकरी रवींद्र लक्ष्मण म्हस्के हे शहरातील लासूर नाका येथील एका पतसंस्थेत आले होते. या ठिकाणी त्यांनी सोने तारण ठेवून येथून कर्ज घेतले होते. कर्जाची ही दीड लाख रुपयांची रक्कम घेऊन ते पतसंस्थेतून जवळच असलेल्या आयसीआयसीआय बँकेत जमा करण्यासाठी जात होते. रस्ता ओलांडत असतानाच मागून आलेल्या दुचाकीस्वारांनी त्यांच्या हातातील दीड लाख रुपये रोकड असलेली बॅग हिसकावून घेतली. पलायन केले. त्यानंतर म्हस्के यांनी आरडाओरड केली. तोपर्यंत चोरट्यांनी दुचाकीवरून दूरपर्यंत धूम ठोकली. या प्रकरणी म्हस्के यांनी गंगापूर पोलिस ठाण्यात तक्ररा दाखल केली आहे.

वर्षभरात अनेक लुटमारीच्या घटना
गंगापूर तालुक्यात मागील वर्षात अनेक लूटमारीच्या घटना घडल्या. यात लाखोंचा ऐवज चोरट्यांनी लंपास केला आहे. यातील अधिक प्रकार हे बंद घराचे कुलूप तोडून चोरी केल्याचे प्रकार आहे. त्यामुळे आता बाहेरगावी जायचं म्हटलं की नागरिकांना भीती वाटत आहे. गंभीर बाब म्हणजे, यातील बहुतांश प्रकरणांचा छडा लावण्यात पोलीस अपयशी ठरले आहेत. तालुक्यातील अवैध धंद्यांकडेही पोलीस सर्रास दुर्लक्ष करत आहेत. येत्या दहा दिवसात तालुक्यातील सर्व अवैध धंदे बंद न केल्यास मनसे स्टाइल आंदोलन करून पोलिस प्रमुखांना जाब विचारला जाईल, असा इशारा मनसेचे जिल्हाध्यक्ष दिलीप बनकर यांनी दिला आहे.

 

Advertisement

Advertisement