Advertisement

‘लागीरं झालं जी’ फेम अभिनेत्यावर काळाचा घाला, कार अपघातात झाला मृत्यू

प्रजापत्र | Tuesday, 18/01/2022
बातमी शेअर करा

मुंबई : ‘लागीरं झालं जी’  या झी मराठी वाहिनीवर गाजलेल्या मालिकेतून लोकप्रियतेच्या शिखरावर पोहोचलेल्या अभिनेत्याचं निधन झालं. अभिनेते ज्ञानेश माने यांना कार अपघातात प्राण गमवावे लागले आहेत. पुण्यातील रोटी घाटातून प्रवास करताना मानेंच्या गाडीला भीषण अपघात झाला होता. घाटातील वळणावर झालेल्या अपघातात ज्ञानेश माने बेशुद्ध झाले होते, मात्र रुग्णालयात नेईपर्यंत त्यांची प्राणज्योत मालवली होती. ज्ञानेश माने यांच्या निधनाने मराठी मनोरंजन विश्वातील कलाकारांवर शोककळा पसरली आहे. ऐन उमेदीच्या काळात मानेंवर काळाने घाला घातल्यामुळे सर्वत्र हळहळ व्यक्त केली जात आहे.

नेमकं काय घडलं?
पुण्यातील रोटी घाटातून प्रवास करताना मानेंच्या गाडीला भीषण अपघात झाला होता. अपघातानंतर ज्ञानेश माने बेशुद्धावस्थेत असल्याचं काही जणांनी पाहिलं. स्थानिकांनी ज्ञानेश यांना पुण्यातील ससून रुग्णालयात दाखल केले, पण दुर्दैवाने ज्ञानेश यांचे प्राण वाचू शकले नाहीत. उपचार करण्यापूर्वीच मानेंनी अखेरचा श्वास घेतल्याची माहिती आहे.

बारामतीचा डॉक्टर ते मराठी अॅक्टर
ज्ञानेश माने हे पेशाने डॉक्टर होते. मात्र अभिनयाची आवड असल्यामुळे त्यांनी या क्षेत्रात पाऊल ठेवलं. ते मूळ पुणे जिल्ह्यातील बारामती, जरडगावचे रहिवासी होते. त्यांच्या पश्चात पत्नी, दोन भाऊ असा परिवार आहे.

अनेक मालिका-चित्रपटात भूमिका
लागिरं झालं जी या मालिकेत ज्ञानेश माने यांनी महत्त्वाची भूमिका साकारली होती. याशिवाय सोलापूर गँगवार, काळूबाईच्या नावानं चांगभलं, अंबुज, हंबरडा, यादया यांसारख्या अनेक चित्रपटांत त्यांनी महत्त्वाच्या भूमिका केल्या होत्या.

नितेश चव्हाणसोबतचे फोटो व्हायरल
ज्ञानेश यांनी ‘लागिरं झालं जी’ मालिकेत अज्याची भूमिका साकारणारा मुख्य अभिनेता नितीश चव्हाण याच्यासोबत लष्करी अधिकाऱ्याची भूमिका साकारली होती. ज्ञानेश मानेंच्या आकस्मिक निधनाचे वृत्त आल्यानंतर नितीश चव्हाण याच्यासोबत त्यांचे फोटो सोशल मीडियावर व्हायरल होत आहेत. ज्ञानेश माने यांच्या निधनाने मराठी मनोरंजन विश्वातील कलाकारांवर शोककळा पसरली आहे.

 

Advertisement

Advertisement