सोलापूर: जिल्ह्यातील पंढरपूर तालुक्यातून धक्कादायक आणि मन सुन्न करणारी घटना समोर आली आहे. म्हसवड येथील सिद्धनाथाचे दर्शन घेऊन परतणाऱ्या भाविकांच्या पिकअप गाडीचा तांदूळवाडी गावाजवळ भीषण झाला. भाविकांनी भरलेली ही पिकअप रस्त्याशेजारील विहिरीत पडली. या भीषण दुर्घटनेत ८ जणांचा पाण्यात बुडून मृत्यु झाला असून, ६ जणांना वाचवण्यात यश आले आहे. या घटनेचा अंगावर काटा आणणारा व्हिडिओही समोर आला असून, या दुर्घटनेमुळे संपूर्ण महाराष्ट्रावर शोककळा पसरली आहे.
मिळालेल्या प्राथमिक माहितीनुसार, पंढरपूर तालुक्यातील रांजणी गावचे रहिवासी असलेले भाविक म्हसवड येथील सिद्धनाथाच्या दर्शनासाठी गेले होते. दर्शन आटोपून आपल्या गावाकडे पिकअप वाहनाने परतत असताना, म्हसवड-पंढरपूर मार्गावरील माळशिरस तालुक्यातील तांदूळवाडी गावाजवळ चालकाचे वाहनावरील नियंत्रण सुटले. गाडी थेट रस्त्या कडेला असलेल्या एका खोल विहिरीत जाऊन कोसळली. या पिकअपमध्ये लहान मुलांसह एकूण १४ प्रवासी स्वार होते.

