बीड दि.७ (प्रतिनिधी): शहरातील स्वराज्य नगर भागात मोकळ्या जागेत जीर्ण अवस्थेत उभ्या असलेल्या चारचाकी बसला अचानक आग लागल्याची घटना गुरुवारी (दि.७) दुपारी घडली. घटनेची माहिती मिळताच नगरपालिकेचे अग्निशामक पथक तात्काळ घटनास्थळी दाखल झाले आणि आग आटोक्यात आणण्यासाठी शर्थीचे प्रयत्न सुरू केले.
मिळालेल्या माहितीनुसार, दुपारी सुमारे एकच्या सुमारास मोकळ्या जागेत उभ्या असलेल्या बसमधून अचानक धूर व ज्वाला निघू लागल्या. परिसरातील नागरिकांच्या ही बाब लक्षात येताच त्यांनी तत्काळ नगरपालिकेला माहिती दिली. त्यानंतर अग्निशामक दलाने घटनास्थळी धाव घेत आग नियंत्रणात आणली. दरम्यान, संबंधित चारचाकी वाहनाला यापूर्वीही काही महिन्यांपूर्वी आग लागल्याची माहिती स्थानिकांकडून मिळत आहे. असे असतानाही संबंधित वाहन त्या ठिकाणाहून हटविण्यात आले नाही किंवा कोणत्याही प्रकारच्या सुरक्षिततेच्या उपाययोजना करण्यात आल्या नसल्याने नागरिकांकडून नाराजी व्यक्त केली जात आहे. सुदैवाने या घटनेत कोणतीही जीवितहानी झाली नाही. मात्र, मोकळ्या जागेत धोकादायक अवस्थेत वाहने उभी ठेवण्याबाबत प्रशासनाने तातडीने कारवाई करावी, अशी मागणी नागरिकांनी केली आहे.

बातमी शेअर करा
