गेवराई दि.२३(प्रतिनिधी): तालुक्यातील उमापूर येथील स्मशानभूमी परिसरात जुन्या वादातून एका शेतकऱ्यावर कोयत्याने वार करून जखमी केल्याची धक्कादायक घटना बुधवार (दि.२२) रोजी सायंकाळी घडली. या हल्ल्यात फिर्यादी आणि मध्यस्थी करण्यासाठी आलेला साक्षीदार दोघेही जखमी झाले असून चकलांबा पोलीस ठाण्यात पाच जणांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
शेषेराव यशवंत कापसे (वय ४८) रा.उमापूर हे आपल्या सहकाऱ्यासह स्मशानभूमी परिसरात बसलेले होते. त्यावेळी कैलास प्रल्हाद पवार, अकाश कैलास पवार, विकास कैलास पवार, शुषमा दिपक सांळुके आणि शंकुतला कैलास पवार सर्व राहणार उमापूर यांनी बेकायदेशीर मंडळी जमवून तिथे प्रवेश केला. कैलास पवार याने फिर्यादीला तू येथे का बसला आहेस असे विचारून शिवीगाळ करण्यास सुरुवात केली. वादाचे रूपांतर हाणामारीत झाले असता कैलास याने शेषेराव यांच्या डोक्यात कोयत्याने प्रहार करून जखमी केले. भांडण सोडवण्यासाठी आलेल्या साक्षीदारावर विकास पवार याने आपल्या हातातील चाकूने डाव्या हातावर वार केले. तसेच आकाश पवार याने लोखंडी रॉडने साक्षीदाराला मारहाण केली. महिला आरोपी शुषमा सांळुके आणि शंकुतला पवार यांनी फिर्यादी व साक्षीदाराच्या डोळ्यात मिरचीची पूड टाकून त्यांना शिवीगाळ करत जीवे मारण्याची धमकी दिली. या प्रकरणी चकलांबा पोलीस ठाण्यात विविध कलमान्वये गुन्हा नोंदवण्यात आला असून पोह.पवार आणि ठोबरे या प्रकरणाचा अधिक तपास करत आहेत.

