Advertisement

मुख्यमंत्र्यांकडून मंत्र्यांना सक्त ताकीद

प्रजापत्र | Tuesday, 29/07/2025
बातमी शेअर करा

मुंबई : मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस (Devendra Fadnavis) यांनी राज्य सरकारमधील सहकारी आणि महायुतीच्या सर्वच मंत्र्यांना पोस्ट कॅबिनेटमधे सक्त ताकीद दिल्याची माहिती आहे. कॅबिनेट बैठकीनंतर मंत्री महोदयांसोबत आयोजित विशेष बैठकीत मुख्यमंत्र्यांनी नाराजी व्यक्त करत मंत्र्यांना इशारा दिला. वादग्रस्त वक्तव्य टाळा, माध्यमांशी संवाद कमी करा, आणि जर वाद निर्माण होणारी कृती घडली तर तात्काळ स्वत: योग्य ते स्पष्टीकरण द्या, अशा सूचना मुख्यमंत्री फडणवीस यांनी केल्या आहेत. गेल्या काही दिवसांत महायुतीमधील (Mahayuti) मंत्र्यांच्या वक्तव्यावरुन आणि कृतीवरुन जनतेमध्ये तीव्र संताप व नाराजी पाहायला मिळत आहे. त्यावरुनच, विरोधकही आक्रमक होत मंत्र्‍यांचा राजीनामा मागत आहेत. त्याच, पार्श्वभूमीवर मुख्यमंत्र्यांनी पोस्ट कॅबिनेट घेत सूचना केल्या. 

             राज्य सरकारच्या कॅबिनेट बैठकीत आज ८ महत्त्वपूर्ण निर्णय घेण्यात आले. मात्र, या बैठकीनंतर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी पोस्ट कॅबिनेट घेत मंत्र्यांची कानउघडणी केली. महायुती सरकारमधील काही मंत्र्‍यांच्या वर्तणुकीवर प्रश्न उपस्थित करत त्यांच्या राजीनाम्याची मागणी केली जात आहे. राष्ट्रवादी काँग्रेसचे माणिकराव कोकाटे असतील, शिवसेनेचे योगेश कदम आणि संजय शिरसाट यांच्या राजीनाम्याची मागणी केली जात आहे. त्यामुळे,सरकारची प्रतिमा मलिन होत असल्याने मुख्यमंत्र्‍यांनी नाराजी व्यक्त केली.यापुढे जर पुन्हा सरकारला अडचण निर्माण होईल अशी कृती झाली तर मला विचार करावा लागेल, अशा शब्दात देवेंद्र फडणवीस यांनी इशारा दिला आहे. 

राज्यातील महायुती सरकारमध्ये सध्या वादातीत माणिकराव कोकाटे, संजय शिरसाट, भरत गोगावले आणि योगेश कदम यांना मुख्यमंत्र्यांनी अप्रत्यक्षपणे टोला लगावला आहे. पोस्ट कॅबिनेट मधे सर्व अधिकाऱ्यांना बैठकीतून बाहेर काढून मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी मंत्र्यांना इशारा दिल्याची माहिती आहे . कारण, या चारही मंत्र्यांकडून वादग्रस्त वक्तव्य अन् कृती घडल्याने जनसामान्यांतून टीका होत आहे. 

 

अजित पवारांकडून माणिकराव कोकाटेंना समज
दरम्यान, माणिकराव कोकाटे यांचा आज राजीनामा घेतला जाणार असल्याची चर्चा राजकीय वर्तुळात होती. त्याच अनुषंगाने माणिकराव कोकाटे यांनी आज उपमुख्यमंत्री अजित पवार यांची भेट घेतली. या भेटीत अजित पवारांनी कोकाटेंना दम भरला असून यापुढे कुठलीही चूक पाठीशी घातली जाणार नसल्याचे म्हटले आहे. त्यामुळे, मुख्यमंत्री व उपमुख्यमंत्र्यांनी आजच मंत्र्यांना इशारा दिला आहे. 

 

Advertisement

Advertisement