महाराष्ट्रात हिंदी सक्तीच्या विरोधात उध्दव ठाकरेंची शिवसेना, मनसे, शरद पवारांची राष्ट्रवादी आणि इतरही अनेक संघटना एकत्र आल्याने जनरेटा पाहून राज्य सरकारने याबाबतीत माघार घेतली. मात्र तरीही भाजपच्या नेत्यांचे, म्हणजे उत्तर भारतीय नेत्यांचे पोटशूळ शमत नाही. एखाद्याचे हिंदी भाषेवरचे प्रेम समजू शकते, पण त्यासाठी मराठीचा दुस्वास कशासाठी? आता तर त्याला महाराष्ट्राबद्दलच्या आकसाचे स्वरूप येत आहे. हा संपूर्ण महाराष्ट्राचा अवमान आहे. उत्तरेकडील नेत्यांना अगदी सुरुवातीपासूनच महाराष्ट्रासह दक्षिणेकडील राज्यांबद्दल कायम आकस राहिलेला आहे. मात्र आजच्या केंद्रीय राज्यकर्त्यांनी देखील संयुक्त महाराष्ट्राचे आंदोलन आणि ४० ते ६० च्या दशकात पेरियार यांनी मद्रास प्रांत आणि तामिळनाडू राज्यात चालविलेल्या आंदोलनाचा अभ्यास करायला हवा.
प्राथमिक शिक्षणातील त्रिभाषा सुत्र आणि त्यातही हिंदीची सक्ती यावरुन महाराष्ट्रातील वातावरण तापले आहे. हिंदी ही राष्ट्रभाषा मानली जाते, त्यामुळे ती शिकण्याला कोणाचा विरोध नाही, मात्र या भाषेची सक्ती करुन उत्तर भारतीय संस्कृती लादण्याचा जो प्रयत्न सातत्याने केला जातो तो मुद्दा दुर्लक्षित करता येणार नाही. आता प्राथमिक शिक्षणात हिंदी सक्तीचा शासन आदेश तात्पुरता रद्द करण्यात आला आहे, पण भाजपचे उत्तर भारतीय नेते हिंदीच्या प्रेमातून मराठीचा आणि महाराष्ट्राचा जो दुस्वास करित आहेत त्यांना काही गोष्टींची आठवण करुन देणे आवश्यक आहे.
स्वातंत्र्यापुर्वीचा मद्रास प्रांत आणि आताचा तामिळनाडू राज्यात ३० ते ६० च्या दशकात रामासामी पेरियार यांनी मोठे आंदोलन उभे केले होते. रामासामी पेरियार यांच्या सर्वच भूमिका आम्हाला मान्य आहेत किंवा आम्ही त्यांच्या सर्वच तत्वज्ञानाशी सहमत आहोत असे मुळीच नाही. पण स्वातंत्र्यापुर्वी आणि नंतर देखील दक्षिणेकडील राज्यांवर हिंदी लादण्याचा जो प्रयत्न झाला त्याला तामिळीजनतेने तब्बल अडीच दशके मोठ्या संघर्षाने विरोध केला आणि अखेर तत्कालीन केंद्रीय सत्तेला नमते घ्यावे लागले असा इतीहास आहे. या ठिकाणी आम्हाला हिंदीला विरोध करायचा नाही, पण प्रत्येक राज्याची एक भाषीय अस्मिता आणि संस्कृती असते, त्यावरचे आक्रमण कोणताच समाज स्विकारत नसतो. तामीळींनी अडीच दशके लढा दिला, महाराष्ट्राला तर त्यापेक्षा मोठी परंपरा संघर्षाची आहे.
संयुक्त महाराष्ट्र चळवळीत खुद्द तत्कालीन पंतप्रधान पंडित नेहरू, मोरारजी देसाई, स. का. पाटील अशांच्या पुढे देखील महाराष्ट्र डगमगला किंवा झुकला नव्हता. अगदी यशवंतराव चव्हांना विरोध करायलाही महाराष्ट्रीय जनमानस कचरले नव्हते हा इतिहास सर्वज्ञात आहे. त्यामुळे मराठीचा आणि त्या आडून महाराष्ट्राचा दुस्वास करणारांना महाराष्ट्राच्या या अस्मितेची माहिती असायला हवी. महाराष्ट्राच्या सत्तेतील भाजपच्या नेत्यांनी आणि राष्ट्रीय स्वयंसेवक संघाने ती करुन द्यायला हवी. महाराष्ट्राचे देशाच्या जडणघडणीत काय योगदान आहे याचा लेखाजोखा कोणा टिनपाटांनी मांडण्याचे काहीच कारण नाही. महाराष्ट्र उत्तरेकडच्या राज्यांमधील कितीतरी बेरोजगारांना आपल्या राज्यात सन्मानाने रोजगार देतो याचे तरी भान दुबेंसारख्यांना असायला हवे. मात्र त्याचे हे मराठी आणि महाराष्ट्रावर गरळ ओकणे इथले सरकार का सहन करीत आहे? आमच्या अस्मिता पक्षीय आणि सत्तीय राजकारणा पलीकडे आहेत हे राज्यकर्ते ठणकावून सांगणार आहेत का? उत्तरेकडील नेत्यांना महाराष्ट्रीय बाणा इथले सत्ताधिश कधी दाखविणार?

प्रजापत्र | Wednesday, 09/07/2025
बातमी शेअर करा
बातमी शेअर करा