Advertisement

राज -उद्धव ठाकरे एकत्र

प्रजापत्र | Saturday, 05/07/2025
बातमी शेअर करा

मुंबई दि.५(प्रतिनिधी): मराठीच्या मुद्यावर एकत्र आलेल्या राज आणि उद्धव ठाकरे  (Uddhav Thackeray) यांनी आगामी काळासाठी एकत्रच कामं करण्याची घोषणा शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी केली. अनाजी पंतांनी आमच्या दोघांतील अंतरपाट दूर केला आहे. आता यापुढे आम्ही दोघ मिळून मराठी माणसाच्या हक्कासाठी लढा देऊ असे म्हटलं. मनसे प्रमुख राज ठाकरे यांनी आम्हाला एकत्र आणण बाळासाहेबांना जमलं नाही ते फडणवीस यांनी केलं असं म्हणत राज्य सरकारवर टीकास्त्र सोडलं.

       वरळीतील एनएससीआय डोममध्ये आयोजित विजयी सभेत ठाकरे बंधूंनी एकजुटीचं प्रदर्शन करत मराठी भाषा आणि महाराष्ट्राच्या हक्कांसाठी लढण्याचा निर्धार जाहीर केला. ही घटना आगामी निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर सत्ताधाऱ्यांसाठी मोठं आव्हान ठरण्याची शक्यता आहे.(Raj Thackeray) महाराष्ट्र सरकारने त्रिभाषा सूत्र मागे घेतल्यानंतर मराठी भाषेच्या लढ्याला मोठं यश मिळालं आहे. या सभेत उद्धव ठाकरे यांनी यावर भाष्य करताना सत्ताधारी महायुतीवर जोरदार टीका केली. “मराठी भाषेला कमकुवत करण्याचा डाव होता, पण आमच्या एकजुटीने तो हाणून पाडला,” असं उद्धव ठाकरे म्हणाले. त्यांनी उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यावर निशाणा साधताना, “महाराष्ट्रातून उद्योगधंदे पळवणाऱ्यांना आणि मराठी भाषेचा अपमान करणाऱ्यांना आता जनता धडा शिकवेल,” असा इशारा दिला. मराठी सक्तीच्या मुद्द्यावर काही जणांनी कोर्टात धाव घेतली असली, तरी मराठी जनतेचा आवाज दडपता येणार नाही, असा विश्वास त्यांनी व्यक्त केला.

 

सत्ताधाऱ्यांना दिलं खुलं आव्हान

या सभेचा सर्वात महत्त्वाचा क्षण होता तो म्हणजे उद्धव ठाकरे यांनी एकत्र येत सत्ताधाऱ्यांना दिलेलं खुलं आव्हान. उद्धव ठाकरे यांनी आपल्या भाषणात सांगितलं, “आम्हाला वापरायचं आणि फेकून द्यायचं, असं सत्ताधाऱ्यांचं धोरण होतं. पण आता आम्ही दोघे भाऊ एकत्र आलोय, आणि यांना फेकून देण्याची वेळ आली आहे!” त्यांनी शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांच्या विचारांचा उल्लेख करताना सांगितलं की, “बाळासाहेबांचा आशीर्वाद आमच्या डोक्यावर आहे. आम्ही कडवट देशाभिमानी मराठी हिंदू आहोत, आणि आम्ही हिंदुत्व कधीच सोडलं नाही.” या वक्तव्यातून त्यांनी विरोधकांनी केलेल्या टीकेचा खणखणीतपणे समाचार घेतला.

आज मोर्चा निघायला पाहिजे होता, मराठी माणूस कसा एकवटतो याचे चित्र उभं राहिले असते. पण नुसतं मोर्चाच्या चर्चेनेच माघार घ्यावी लागली. कोणत्याही वादापेक्षा आणि भांडणापेक्षा महाराष्ट्र मोठा आहे. जवळपास २० वर्षानंतर उद्धव आणि मी एकत्र येत आहे. जे बाळासाहेब ठाकरें यांना जमलं नाही, जे इतर कोणालाही जमलं नाही ते देवेंद्र फडणवीस यांना जमलं, असे राज ठाकरे म्हणाले.

Advertisement

Advertisement