पालकांना खाजगी कोचिंग लकसेसचे असलेले वेड आणि कथित आयआयटीवाले आहेत म्हणजे जणू आपल्या लेकराला नीट , जेईई आदी सगळ्या परीक्षा उत्तीर्ण करून देण्याची जादूची छडीच त्यांच्याकडे आहे असा झालेला भ्रम याचा पुरेपूर फायदा उठविणारी यंत्रणा खाजगी कोचिंग क्लासेसने विकसित केलेली आहे.आतातर कधी राजस्थान तर कधी आणखी कोणते नाव वापरायचे , कधी कोणत्यातरी मोठ्या समूहाची फ्रँचाइजी , त्याचे नामवंत शिक्षक दाखवून प्रवेश मिळवायचे आणि नंतर मात्र शिक्षकच बदलायचे असला दिखाऊ माल फसावू धंदा क्लासेसमध्ये सुरु आहे. 'गुरुकुल' म्हणून ज्या क्षेत्राची ख्याती होती त्या क्षेत्रात असा 'घोडे'बाजार सुरु झालेला आहे.
खाजगी कोचिंग क्लास ही खरेतर एकेकाळी अगदी मूठभर लोकांची आवश्यकता होती. ऐंशी , नव्वदच्या दशकापर्यंत तर खाजगी शिकवणी लावणे म्हणजे अभ्यासातील कमकुवतपणाचे लक्षण मानले जायचे. त्यावेळी तुलनेने शाळा, महाविद्यालयांची संख्या देखील कमी होती, तरी देखील अशा खाजगी शिकवण्याचे पेव फुटलेले नव्हते. मात्र नंतरच्या काळात सारीच परिस्थिती बदलली, या क्षेत्रातील पैशाचे अर्थकारण किती मोठे होऊ शकते याची अनेक उदाहरणे समोर यायला लागली आणि ज्यांना शाळा , महाविद्यालयात शिकविण्यासाठी आवश्यक असलेल्या 'पात्रता ' नाहीत, ज्यांना नेट सेटची वाट कधी आवडली नाही , अशा लोकांच्या चरितार्थाचे साधन म्हणून देखील खाजगी क्लासेस मोठ्याप्रमाणावर वाढले. आज अनेक खाजगी क्लासेसमध्ये जे लोक शिकवितात , त्यांच्या शैक्षणिक पात्रता किंवा त्यांचे शैक्षणिक कौशल्य कागदावर काय आहे, हे पाहायला गेले तर आपल्या पाल्याचे भवितव्य आपण कोणाच्या हाती देत आहोत याचा विचार करून भोवळ यावी असेच चित्र आहे. याला काही अपवाद आहेत, काहींकडे गुणवत्ता आहे, अपेक्षित पदवी नसली तरी कौशल्य आहे हे नक्की. पण हे अपवादानेच. इतर ठिकाणी तर सारी बोंब आहेच.
क्लासेस सुरु करायचे, त्याला कुठल्यातरी मोठ्या समूहाची जोड द्यायची, आमच्याकडचे शिक्षक अमुक तमुक ठिकाणाहून आले आहेत असे भासवायचे आणि नंतर मात्र प्रत्यक्षात शिकवायला वेगळेच असले प्रकार देखील या क्षेत्रात सर्रास सुरु आहेत. अगदी बीडसारख्या ठिकाणी त्याचे लोन पोहचले असेल तर राज्याचे चित्र किती भीषण असेल? ज्याच्याकडे 'गुरुकुल' म्हणून पहिले जाते अशा क्षेत्रातील एका शिक्षण संस्थेने मध्यंतरी एका बाहेरच्या कोचिंग समूहाची फ्रँचाइजी म्हणून प्रवेश मिळविले. त्यावेळी शिकवायला म्हणून ज्या फॅकल्टी दाखविल्या होत्या, त्यांचे शिक्षण , त्यांचा असलेला नसलेला अनुभव सारे काही दाखविल्याने कोणी दहा हजार, कोणी वीस हजार भरून प्रवेश घेतले, काही दिवस सारे काही सुरु झाले आणि नंतर विद्यार्थ्यांचा निकाल घरसल्याचे लक्षात आल्यावर पालकांनी विचारणा केली , त्यावेळी प्रत्यक्षात शिकवायला वेगळेच लोक आहेत हे समोर आहे. असल्या 'घोडे ' बाजाराचे करायचे तरी काय ? बीडमध्ये झाले ते एक उदाहरण, अशी परिस्थिती कमी अधिक फरकाने सर्वत्र आहे. प्रवेश घेताना जे प्राध्यापक, शिक्षक दाखविले जातात , ते शेवटपर्यंत असतीलच याची खात्री नाही. बरे ज्यांच्या नावाने क्लासेस चालतात , आणि ज्या 'सक्सेस'चे गोडवे गेले जातात , तेथे जाहिरातीत सांगताना प्रशस्त क्लासरूम असते, मात्र प्रत्यक्षात विद्यार्थी कोंडवाड्यात कोंडवे असे कोंडले जातात . प्रत्येकालाच आपल्या पाल्याला नीट , जेईई अशा ठिकाणी पात्र करायचे आहे, त्यामुळे खरोखर पात्र होण्याचा टक्का किती याचा विचार न करता पालकांचा ओढा देखील अशा ठिकाणी असतोच. 'लॉ ऑफ प्रोबॅबिलिटी' नावाची एक संकल्पना आहे, किंवा शुद्ध ग्रामीण भाषेत 'तुक्का बसने ' असे जे म्हणतात, त्या न्यायाने प्रत्येक ठिकाणचे काही विद्यार्थी यशस्वी होणार असतातच, पण त्याचाच दिखावा केला जातो आणि अनेकांच्या डोळ्यात एक वेगळी धूळफेक केली जाते.
मुळात प्रवेश घेतानाच ज्यांना दहावीत ९० टक्क्यांच्या पुढे गुण आहेत त्यांनाच प्रवेश द्यायचा, त्यातही आता ९५ टक्केच्या पुढचे विद्यार्थी वाढले आहेत , आणि मग त्यांच्यावरच आपण किती परिश्रम घेतले ते दाखवायचे, जे मुळातच हुशार आहेत, त्यांच्या हुशारीचा फायदा उचलत त्याचे श्रेय घेण्याचा दिखाऊपणा हा खाजगी क्लासेस क्षेत्राचा गुणधर्म झाला आहे, आणि यात पालक भरडला जात आहे, पण त्याच्या डोळ्यावर पट्टी आहे, त्याच्या जाणिवेत, नेणिवेत , क्लासेस नाही लावले तर विद्यार्थी यशस्वी होणार नाही हे या व्यवस्थेने पुरते बसवून टाकले आहे. कदाचित त्यामुळेच १७ वर्षाखालील विद्यार्थ्यांना खाजगी कोचिंग क्लासेसमध्ये प्रवेश देऊ नये अशी नियमावली आल्यानंतर याच क्लासेसच्या संघटनांनी किती गहजब माजविला होता, त्याबद्दल पुढच्या भागात . पण क्लासेसचा हा जो 'दिखाऊ माल फसावू धंदा' त्यावरही महाराष्ट्र विधिमंडळाच्या पावसाळी अधिवेशनात येऊ घातलेल्या कायद्यात विचार व्हावा ही अपेक्षा .

बातमी शेअर करा