परळी दि.३(प्रतिनिधी): दिवंगत भाजपा नेते गोपीनाथ मुंडे यांचा आज स्मृति दिन आहे. दरवर्षी यादिवशी परळीच्या पांगरी येथील गोपीनाथ गडावर विविध कार्यक्रमांचे आयोजन केले जाते. यंदा मंत्री पंकजा मुडेंसह संपूर्ण कुटुंब उपस्थित होते. गोपीनाथ मुंडेंच्या स्मृति दिनी पहिल्यांदाच पंकजा मुंडे आणि धनंजय मुंडे एकत्र मंचावर आले. या कार्यक्रमासाठी धनंजय मुंडेही उपस्थित होते. यासोबतच प्रीतम मुंडे आणि पंकजा यांचा मुलगा देखील मंचावर उपस्थित होता. पंकजा मुंडे आपल्या भाषणात काय बोलणार याकडे सर्वांच्या नजरा होत्या. गोपीनाथ मुंडेंच्या आठवणीला पंकजांनी उजाळा दिला आहे.
पंकजा मुंडे म्हणाल्या की, या कार्यक्रमांच्या माध्यमातील त्यांना जिवंत ठेवण्याचा आणि त्यांच्या विचारांना जिवंत ठेवण्याचा आम्ही प्रयत्न करतो. अपघाताने माणसे दुरावतात, अपघाताने माणसे एकत्र येतात. आज जर मुंडे साहेब असते तर देशातील फार मोठ्या पदावर नक्कीच असते, त्यांच्या सहकार्यांसोबत ते आपल्याला रोज दिसले असते. तुम्ही त्यांना कुठे शोधता हे माहिती नाही, पण मी तुमच्यामध्ये त्यांना शोधते.
आज ११ वर्ष पूर्ण झाली आहेत, गावागावात मुंडे साहेबांची जयंती साजरी होते. हे आमचे भाग्य आहे, आमच्या परिवाराचे भाग्य आहे. मी आज जिजांचा (दिवंगत आमदार आर.टी देशमुख) फोटो गोपीनाथ गडावर लावला आणि मी सुतक देखील पाळले. मला ब्राह्मणांने सांगितले की, जिजासाठी ताई तुम्ही एखादा पदार्थ सोडा बरं का...मी लेक म्हणून इथे तीन दिवस थांबून राहिले. हे ऋणानुबंध आहेत, इथे ना जात आहे ना धर्म...
कठीण यातनेतूनच मोठं होता येतं. रावणाला कुठे वणवास झाला, कुठे कोरवांना वनवास झाला. कुठेही चांगलाच माणसांना त्रास होत असतो, असेही पंकजा मुंडे यांनी म्हटले. त्या पुढे म्हणाल्या की, आम्ही यातना भोगायला पण तयार आहोत, जर तुम्ही आमच्यासोबत आहात तर आम्ही यातना भोगायलाही तयार आहोत. यावेळी पंकजा मुंडे कार्यक्रमासाठी आलेल्या लोकांचे आभार व्यक्त करताना दिसल्या. यावेळी गोपीनाथ मुंडे यांच्या पुण्यतिथीच्या कार्यक्रमात मुंडे परिवारातर्फे फक्त पंकजा मुंडे यांचेच भाषण झाले.