Advertisement

 क्रिकेट संघाच्या मिरवणुकीसाठी गुजरातची बस

प्रजापत्र | Thursday, 04/07/2024
बातमी शेअर करा

  भारतीय क्रिकेट संघाच्या मिरवणुकीसाठी गुजरातहून बस मागविण्यात आली आहे. यामुळे आता विरोधकांकडून टीका केली जात आहे. महाराष्ट्र सरकार गुजरातधार्जिणे आहे, अशी टीका काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांनी केली. मुंबईत होणाऱ्या मिरवणुकीसाठी गुजरातहून बस आणून एकप्रकारे महाराष्ट्राचा अवमान करण्यात आला आहे, अशी टीका त्यांनी केली. शिवसेना उबाठा गटाचे नेते आदित्य ठाकरे आणि रोहित पवार यांनीही गुजरातहून बस मागितल्यावरून टीका केली आहे.

 

 

भारतीय क्रिकेट संघाने १७ वर्षांनंतर टी-२० विश्वचषक आणि १३ वर्षांनंतर आयसीसी स्पर्धा जिंकली आहे. विजयाचा हा आनंद साजरा करण्यासाठी आज मरीन ड्राईव्ह ते वानखेडे मैदानापर्यंत विजयी मिरवणूक काढण्यात येणार आहे. २००७ रोजी भारताने पहिलाच टी-२० विश्वचषक जिंकल्यानंतरदेखील मरीन ड्राईव्ह ते वानखेडे अशी मिरवणूक काढली गेली होती. महेंद्रसिंह धोनीच्या नेतृत्वाखालील संघाचे स्वागत मुंबईकरांनी मोठ्या जल्लोषात केले होते. रोहित शर्मा त्या संघाचाही भाग होता आणि आजच्या जगज्जेत्या संघाचा तो कर्णधार आहे.

 

 

रोहित पवारांची टीका
राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे नेते आमदार रोहित पवार यांनीही गुजरातमधून बस आणण्याबाबत नाराजी व्यक्त केली. भारतीय संघाच्या खेळाडूंना देशाने ताकद दिली, त्यामुळे आपण ही स्पर्धा जिंकू शकलो, याचा आम्हाला अभिमान आहे. पण मुंबईत भारतीय संघ येत आहे आणि जर का मिरवणूक काढली जात असेल तर मुंबईची बेस्ट बस यासाठी वापरायला हवी होती. बेस्ट बस आणि मुंबई अशी एक वेगळी ओळख आहे. त्यामुळे बेस्टची बस वापरली गेली असती, तर आम्हाला आणखी आनंद झाला असता. बीसीसीआयने गुजरातहून बस आणलीच आहे, पण त्यांनी बेस्टच्या बसची निवड करायला हवी होती, असेही रोहित पवार म्हणाले.

मुंबईतील विजय परेडसाठी बीसीसीआयने एक विशेष बस तयार केली आहे. बसच्या चहुबाजूला भारतीय संघाने चषक उचलून केलेल्या सेलिब्रेशनचे मोठे आणि विहंगम फोटो लावण्यात आले आहेत. डबल डेकर बसमधून भारतीय खेळाडू सुमारे दीड किमीच्या मिरवणुकीत सहभागी होतील. संपूर्ण संघ बीसीसीआय कार्यालयात पोहोचेल. या बसचे फोटो आणि व्हिडिओ सध्या सोशल मीडियावर व्हायरल होत आहेत.

भारतीय क्रिकेट संघाच्या या ऐतिहासिक विजयाबद्दल बीसीसीआयच्या वतीने वानखेडे स्टेडियमवर खेळाडूंच्या सत्कार समारंभाचे आयोजन करण्यात आले आहे. या कार्यक्रमाला जास्तीत जास्त लोकांनी हजेरी लावावी यासासाठी आज वानखेडे स्टेडियममध्ये मोफत प्रवेश देण्यात आला आहे. मुंबई क्रिकेट असोसिएशनचे सचिव अजिंक्य नाईक यांनी ही घोषणा केली आहे. स्टेडियममध्ये प्रथम येणाऱ्यास प्रथम सेवा या तत्त्वावर प्रवेश मिळेल.

Advertisement

Advertisement