Advertisement

 भाजप सरकारच्या काळात सर्वात मोठा कोळसा घोटाळा

प्रजापत्र | Wednesday, 22/05/2024
बातमी शेअर करा

काँग्रेस नेते राहुल गांधी यांनी सोशल मीडियावर पोस्ट करून मोठी खळबळ उडवून दिली आहे. भाजप सरकारच्या काळात सर्वात मोठा कोळसा घोटाळा झाला, असा आरोप राहुल गांधी यांनी केला आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचे मित्र गौतम अदानी यांनी तिप्पट किमतीत कोसळशाची विक्री केली, असंही राहुल गांधींनी म्हटलं आहे.

 

या उघड भ्रष्टाचारावर ईडी, सीबीआय आणि आयटी गप्प बसण्यासाठी किती टेम्पो वापरले गेले हे पंतप्रधान सांगतील का? असा सवालही राहुल गांधी यांनी उपस्थित केला आहे. ४ जूननंतर, भारत सरकार या मेगा घोटाळ्याची चौकशी करेल आणि जनतेकडून लुटलेल्या प्रत्येक पैशाचा हिशेब घेईल, असा इशाराही त्यांनी दिला.सध्या देशभरात लोकसभा निवडणुकीची रणधुमाळी सुरू आहे. पाचव्या टप्प्यातील मतदानानंतर आता सहाव्या टप्प्यातील प्रचार जोरदार सुरू आहेत. पंतप्रधान नरेंद्र मोदी काँग्रेसवर घराणेशाही, भ्रष्टाचार तसेच मुस्लिम आरक्षणाच्या मुद्द्यावरून जोरदार टीका करीत आहेत.दुसरीकडे राहुल गांधी सुद्धा भाजपसह पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यावर टीकेची झोड उठवत आहेत. भाजप सरकारच्या काळात अनेक मोठे भ्रष्टाचार झाल्याचा आरोप राहुल गांधी करत आहेत. या निवडणुकीत देशातील मतदार भाजपला धडा शिकवणार, असा दावाही राहुल गांधी करीत आहेत.

 

 

राहुल गांधींनी पोस्टमध्ये काय म्हटलंय?
"भाजप सरकारमध्ये मोठा कोळसा घोटाळा उघडकीस आला आहे. वर्षानुवर्षे सुरू असलेल्या या घोटाळ्यातून मोदीजींचे प्रिय मित्र अदानी यांनी कमी दर्जाचा कोळसा तिप्पट किमतीत विकून हजारो कोटी रुपयांची लूट केली आहे, ज्याची किंमत सर्वसामान्य जनतेने महागडी वीज बिले भरून स्वतःच्या खिशातून चुकवली आहे", असा आरोप राहुल गांधींनी केला आहे.

"या उघड भ्रष्टाचारावर ईडी, सीबीआय आणि आयटी गप्प बसण्यासाठी किती टेम्पो वापरले गेले हे पंतप्रधान सांगतील का? ४ जूननंतर, भारत सरकार या मेगा घोटाळ्याची चौकशी करेल आणि जनतेकडून लुटलेल्या प्रत्येक पैशाचा हिशेब देईल", असा इशाराही राहुल गांधी यांनी दिला आहे.

Advertisement

Advertisement