मुंबई : राज्यात मागील काही दिवसांपासून पावसाच्या हलक्या ते मध्यम सरी बरसत असल्या, तरी बहुतांश भागांत अद्यापही समाधानकारक पाऊस झालेला नाही. अनेक ठिकाणी ऊन-सावल्यांचा खेळ सुरू असून, वातावरणात दमटपणा जाणवत आहे. पावसासाठी पोषक वातावरण तयार होत असले तरी सर्वदूर जोरदार पाऊस पडताना दिसत नाही. त्यामुळे शेतकरी आणि नागरिकांचे लक्ष आता चांगल्या पावसाकडे लागले आहे.
कोकणात पावसाची उघडीप
मागील पंधरा दिवसांपासून कोकणातील अनेक भागांत पावसाने उघडीप घेतली आहे. काही ठिकाणी हलक्या ते मध्यम सरी पडत असल्या, तरी दिवसभर उन्हाचा चटका जाणवत आहे. सध्या कोकणासाठी कोणताही विशेष पावसाचा इशारा देण्यात आलेला नाही. पुढील काही दिवस या भागात कोरडे, दमट आणि उष्ण हवामान कायम राहण्याचा अंदाज आहे.
उत्तर महाराष्ट्रात उष्ण आणि दमट वातावरण
उत्तर महाराष्ट्रातही पावसाची उघडीप कायम आहे. बहुतांश भागांत उष्ण आणि दमट हवामान जाणवत असून, पुढील काही दिवस मोठ्या पावसाची शक्यता कमी आहे. त्यामुळे शेतीच्या दृष्टीने चांगल्या पावसाची प्रतीक्षा कायम आहे.
पश्चिम महाराष्ट्रात तुरळक सरींची शक्यता
पुणे, कोल्हापूर, सातारा, सांगली आणि सोलापूर जिल्ह्यांत हलका ते मध्यम पाऊस पडण्याची शक्यता आहे. मात्र, या भागासाठी कोणताही विशेष अलर्ट जारी करण्यात आलेला नाही. काही ठिकाणी पावसाची तूट असल्याने शेतकऱ्यांची चिंता वाढली आहे.

