Advertisement

 बीड - राज्याच्या राजकारणातील दोन बडे चेहरे, सामाजिक न्यायमंत्री धनंजय मुंडे आणि पंकजा मुंडे आज एकाच व्यासपीठावर पाहायला मिळाले. एकमेकांचे कट्टर राजकीय शत्रू असलेले दोन्ही नेते आज गहिनीनाथ गडावर एकाच मंचावर आले. यावेळी धनंजय मुंडे यांनी पंकजा मुंडेंना टोला लगावला.

यावेळी धनंजय मुंडे म्हणाले की, 'माजी पालकमंत्र्यांनी दिलेल्या शुभेच्छा घेऊन जिल्ह्यात येत्या चार वर्षात विकासाचे असे काम करू की पुढील अनेक वर्ष त्यांना आम्हाला शुभेच्छा द्याव्या लागतील असे धनंजय मुंडे म्हणाले. संत वामनभाऊ महाराज यांच्या 45 व्या पुण्यतिथी सोहळ्यानिमित्त पाटोदा तालुक्यातील गहिनीनाथ गड येथे आयोजित कार्यक्रमात ते बोलत होते.

मागील सरकारच्या काळात 'ब' दर्जाचे तीर्थक्षेत्र म्हणून प्रसिद्ध असलेल्या गहिनीनाथगडास मागील सरकारच्या काळात विविध विकास कामांसाठी 25 कोटी रुपयांचा निधी देण्याची घोषणा करण्यात आली होती. परंतु प्रत्यक्षात फक्त दोन कोटी रुपये प्राप्त असल्याची कबुली माजी आमदार भीमराव धोंडे यांनी दिली. रखडलेले 23 कोटी रुपये व अधिकचे 5 कोटी रुपये निधी राज्य सरकारच्या माध्यमातून या तिर्थक्षेत्राच्या विकासासाठी येत्या दोन वर्षात उपलब्ध करून देऊ असा शब्दही यावेळी बोलताना धनंजय मुंडे यांनी दिला आहे.

ऊसतोड मजुरांचा जिल्हा ही ओळख पुसून टाकून सर्वाधिक ऊस पिकवणारा जिल्हा अशी ओळख निर्माण करून देणे आणि जिल्ह्याची मागासलेपण दूर करणे हा आपला निर्धार असल्याचे धनंजय मुंडे यांनी बोलून दाखवले.

यावेळी गहिनीनाथ गडाचे महंत ह.भ.प. विठ्ठल महाराज शास्त्री, खा. प्रीतमताई मुंडे, आ. बाळासाहेब काका आजबे, माजी मंत्री पंकजाताई मुंडे, माजी मंत्री जयदत्त क्षीरसागर, बजरंगबप्पा सोनवणे, मा.आ. साहेबराव दरेकर, मा.आ. भीमराव धोंडे, सतिष शिंदे, जयदत्त धस, शिवभूषण जाधव, आप्पासाहेब राख, अण्णासाहेब चौधरी, विठ्ठल सानप, विश्वास नागरगोजे, शिवाजीराव नाकाडे, सतिश बडे यांसह गडाचे वारकरी - टाळकरी व परिसरातील नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते.

 

Advertisement

Advertisement