Advertisement

कफ सिरफमुळे बारा चिमुरड्यांचा मृत्यु

प्रजापत्र | Sunday, 05/10/2025
बातमी शेअर करा

मुंबई: राजस्थान आणि मध्य प्रदेशात भेसळयुक्त कफ सिरपमुळे १२ लहान मुलांचा मृत्यु झाल्याची गंभीर घटना उघडकीस आली आहे. माहितीनुसार, या बालकांनी विशिष्ट कफ सिरप घेतल्यानंतर त्यांचे मूत्रपिंड निकामी झाले आणि त्यांचा मृत्यू झाला. या घटनेनंतर केंद्र सरकारने सर्व राज्यांना दोन वर्षांखालील मुलांना कोणतेही कफ सिरप न देण्याचे महत्त्वपूर्ण निर्देश दिले आहेत.

मृत्यूमुखी पडलेल्या मुलांना दिलेल्या कफ सिरपमध्ये इथिलीन ग्लायकॉल आणि डायथिलीन ग्लायकॉल हे औद्योगिक वापरासाठी असलेले धोकादायक घटक आढळल्याचा आरोप आहे. तज्ज्ञांच्या मते, हे घटक मूत्रपिंड आणि मेंदूला गंभीर नुकसान पोहोचवू शकतात. कोल्ड्रफ आणि नेक्सा डीएस या दोन औषधांवर तामिळनाडू, केरळ, मध्य प्रदेश आणि राजस्थान या चार राज्यांमध्ये बंदी घालण्यात आली आहे. महाराष्ट्रातही २६ हजार लिटर कफ सिरपचा साठा नष्ट करण्यात आला आहे. अन्न-औषध प्रशासनाच्या कार्यपद्धतीवर यामुळे प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे. 

Advertisement

Advertisement