मुंबई : विधिमंडळाच्या आवारात गुरुवारी संध्याकाळी भाजप आमदार गोपीचंद पडळकर आणि शरद पवार गटाचे आमदार जितेंद्र आव्हाड यांच्या कार्यकर्त्यांमध्ये हाणामारी झाली होती. या घटनेमुळे राज्य विधिमंडळाच्या प्रतिमेला बट्टा लागला होता. याबाबत विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकर यांनी शुक्रवारी सभागृहात भाष्य केले. यावेळी जितेंद्र आव्हाड यांनी आपल्याला जीवे मारण्याची धमकी आल्याचा मुद्दा उपस्थित केला. मात्र, विधानसभा अध्यक्षांनी मांडलेल्या प्रस्तावाचा आणि आव्हाडांच्या धमकीच्या मुद्द्याचा एकमेकांशी संबंध नाही, असा आक्षेप मुख्यमंत्री (Devendra Fadnavis)देवेंद्र फडणवीस यांनी नोंदवला. यावर विरोधकांनी खळखळ करताच देवेंद्र फडणवीस हे संतापल्याचे पाहायला मिळाले.
धमकीचा उल्लेख करण्याला कोणाची मनाई नाही. अध्यक्षांनी एखादा प्रस्ताव मांडल्यानंतर कधीतरी आपण राजकारणापलीकडे जाणार आहात की नाही? धमकीचा विषय वेगळा मांडता येईल. कालच्या घटनेने कोणा एका व्यक्तीची प्रतिष्ठा खराब झालेली नाही. इथल्या बसलेल्या प्रत्येकाची प्रतिष्ठा खराब झाली आहे. आज बाहेर ज्या काही शिव्या पडत आहे, त्या एकट्या पडळकर किंवा यांच्या माणसाला पडत नाहीत. आपल्या सगळ्यांच्या नावाने याठिकाणी बोलले जाते, हे सगळे आमदार माजले आहेत. त्यामुळे या गोष्टी गांभीर्याने घ्या. प्रत्येक गोष्टीचं राजकारण करुन आपण महाराष्ट्रातील जनतेला काय सांगणार आहोत. अशाप्रकारे समर्थन करणे योग्य नाही, असे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी म्हटले.