Advertisement

संपादकीय अग्रलेख- उणीवेची जाणीव

प्रजापत्र | Tuesday, 03/06/2025
बातमी शेअर करा

  राजकारण, समाजकारण असेल किंवा व्यक्तिगत जीवन , त्यातून कोणीतरी एक्झिट घेतो, निघून जातो, मग ते अकाली असेल किंवा कसेही , त्यावेळी त्याच्या जाण्याने पोकळी निर्माण होत असतेच , हळूहळू ती पोकळी भरून निघतेही, मात्र राजकारण,समाजकारणातील काही व्यक्तींचा प्रभावच असा असतो की त्यांच्या जाण्याने निर्माण झालेली पोकळी कधी भरूनच निघत नाही. त्यांचे राजकरण, समाजकारण असे असते आणि काळाची चक्रे देखील अशी काही फिरतात की, त्यांच्या नसण्याची जाणीव क्षणाक्षणाला प्रकर्षाने जाणवत असते . ज्यांच्या उणिवेची जाणीव कायम होत राहते, किंबहुना अधिकच वाढत राहते अशी व्यक्ती म्हणून आज दिवंगत गोपीनाथ मुंडे प्रकर्षाने समोर येतात. बीड जिल्ह्यातीलच नव्हे तर राज्यातीलच राजकारण, समाजकारण एका अस्वस्थ वळणावर उभे असताना दिवंगत गोपीनाथ मुंडेंचे सर्वसमावेशक राजकारण आणि समाजकारण अधिकच जोरकसपणे समोर येत राहते . आज गोपीनाथ मुंडे असते तर जिल्ह्यात अशी सामाजिक अस्वस्थता नक्कीच दिसली नसती.
----
मागच्या काही काळापासून, खरेतर दिड , दोन वर्षांपासून बीड जिल्हा राज्याच्या पटलावर या ना त्या कारणाने चर्चेत आहे. तसे तर बीड जिल्हा कायमच राज्याच्या चर्चेत राहिलेला आहे, पण त्या चर्चा सकारात्मक असायच्या. दिवंगत गोपीनाथ मुंडे , दिवंगत केशरबाई क्षीरसागर, दिवंगत प्रमोद महाजन आदी नेत्यांमुळे बीड जिल्ह्याकडे राजकीयदृष्ट्या वेगळ्या नजरेने पाहिले जायचे. नाना पाटील , गंगाधर बुरांडे, द्वारकादास मंत्री अशा वेगवेगळ्या विचारसरणीच्या व्यक्तींना राजकारणात प्रतिनिधित्व देणारा जिल्हा म्हणून बीडची ओळख होती. दिवंगत गोपीनाथ मुंडे यांनी बीडची ही राजकीय, सामाजिक ओळख अधिकच व्यापक केली, विस्तृत केली. त्याच बीड जिल्ह्यात मागच्या एक दोन वर्षात जातीय तणाव आणि जातीय दरी विकोपाला गेलेली आहे. एक अस्वस्थ करणारी खदखद मनामनात आहे. जणू काही आपण सारेच जातीय विद्वेषाच्या ज्वालामुखीवर बसलो आहोत असे वाटावे अशी परिस्थिती आहे. इतका विद्वेष, विखार आणि अविश्वास बीडच्या मातीत कधीच नव्हता, जो आज अनुभवायला मिळतोय आणि म्हणूनच आज दिवंगत गोपीनाथ मुंडे यांचे नसणे अधिकच आठवतेय.
दिवंगत गोपीनाथ मुंडे यांचे राजकारण , समाजकारण बहरले ते भाजपमध्ये. तेव्हाच भाजप आज बनू पाहतोय तसा ओबीसीस्नेही असा काही नव्हता. त्यावेळी भाजपवर एका विशिष्ट वर्गाचा शिक्का होता. अशा भाजपमधून एका बहुजन समाजातून पुढे आलेल्या व्यक्तीने राजकारण, समाजकारण करणे तसे अवघडच, पण वसंतराव भागवतांनी गोपीनाथ मुंडेंना त्यासाठी निवडले आणि भाजपचा 'माधव' तसा प्रयोग महाराष्ट्रात यशस्वी झाला. गोपीनाथ मुंडेंच्या राजकारणाने महाराष्ट्रात भाजपला सत्तेचा सोपं चढता आला. त्यात चांदा ते बांदा पर्यंतच्या अनेक नेते , कार्यकर्त्यांचे योगदान होतेच, पण त्याची कमान सांभाळली होती ती गोपीनाथ मुंडेंनीच . सर्वसमावेशक राजकारण करताना , उपेक्षित घटकांना सोबत घेणे आणि विश्वास देणे यात गोपीनाथ मुंडेंचा हातखंडा होता.
बीड जिल्ह्यातील सामाजिक परिस्थिती आणखीच वेगळी होती. गोपीनाथ मुंडेंचा राजकीय उदय होत असताना येथील राजकारणावर प्रभाव होता केशरकाकू क्षीरसागर यांचा. त्यांनी बीड जिल्ह्यातील दलित, मुस्लिम आणि ओबीसी समाज स्वतःसोबत जोडून ठेवला होता. अगदी येथील वंजारा समाज देखील त्यांच्यासोबतच असायचा. त्यावेळी केशरकाकू क्षीरसागर यांना मराठा समाजातील राजकीय नेत्यांचे आव्हान होतेच, नाही असे नाही, पण विरोध किंवा ते आव्हान निव्वळ राजकीय स्वरूपाचे होते, त्यात जातीय विखाराची भावना नव्हती. गोपीनाथ मुंडे तर राजकारणात आणखी एक पाऊल पुढे गेले. क्षीरसागरांच्या राजकारणात बीड जिल्ह्यातील जी राजकीय घराणी काहीशी विजनवासात गेली होती, त्यांनाच्या वारसांना गोपीनाथ मुंडेंनीच राजकारणात पुन्हा वैभव मिळवून दिले. नामोल्लेख करण्याची आवश्यकता नाही, पण अशी यादी खूप मोठी होईल. त्यामुळेच गोपीनाथ मुंडे यांचे राजकारण आणि समाजकारण दिवसेंदिवस सर्वव्यापी होत गेले. वेगवेगळ्या संस्थांच्या माध्यमातून कार्यकर्त्यांना न्याय देताना त्यांनी सामाजिक संतुलन साधण्याचा जो प्रयत्न केला, त्यातूनच मग गोपीनाथ मुंडेंचे समाजकारण देखील व्यापक झाले. त्यांना सर्व समाजात स्वीकारार्हता निर्माण झाली. निवडणुकीपुरते जातीय मुद्दे यायचे, पण ते तेव्हढ्यापुरतेच. त्यामुळेच त्यांच्या काळात असा जातीय विखार बीड जिल्ह्याच्या सामान्यांमध्ये कधी पोहचला नव्हता. ओबीसींचे नेते म्हणवणारे गोपीनाथ मुंडे मराठा सेवा संघाच्या अधिवेशनाला सहज म्हणून जायचे आणि ते कधी कोणाला खुपले नाही. गोपीनाथ मुंडेंचे भाजपमध्ये असणे कधी मुस्लिम समाजाला खुपले नाही आणि आंबेडकरी चळवळीतील नेत्यांना देखील मुंडे कधी परके वाटले नाहीत. दिवंगत विनायक मेटे गोपीनाथ मुंडेंसोबत राहिले. अगदी भटक्या समाजाला देखील मुंडे आपले वाटायचे आणि कदाचित या साऱ्या गोष्टींमुळेच बीड जिल्ह्यात निवडणुकीमध्ये दिसणारा जातीयवाद निवडणूक संपल्यानंतर रोजच्या जगण्यात सहसा कधी डोकवायचा नाही.यात दिवंगत गोपीनाथ मुंडेंच्या राजकारण , समाजकारणाचा मोठा वाटा होता.
आज कोठेतरी हे सर्वसामावेशकत्व हरवले आहे. चूक कोणाची, कोठे चुकले, काय चुकले ? कोण आक्रमक झाले, कोणी राजकारण केले या साऱ्या बाबींवर प्रत्येकाची मते वेगवेगळी असणारच, पण बीड जिल्ह्याला जातीयवादाच्या अस्वस्थ केले आहे हे कटू वास्तव आहे आणि अशावेळी गोपीनाथ मुंडेंचे नसणे प्रकर्षाने जाणवतेय
.
 

Advertisement

Advertisement