परळी वैजनाथ - पाऊस पडत नसल्याने पिके वाळून चालली आहेत. दुष्काळाने चिंता वाढवली असून आपल्यावरील कर्ज कसे फेडावे याच्या भ्रांतीत असलेल्या वैजवाडी येथील एका शेतकऱ्याने कर्जबाजारीपणाला कंटाळून आत्महत्या केल्याची घटना घडली आहे.
परळी तालुक्यातील वैजवाडी या गावचे रहिवासी असलेले बालाजी ज्ञानोबा ढाकणे वय 45 वर्षे या शेतकऱ्याने शेतातील झाडाला गळफास लावून आत्महत्या केल्याची घटना आज (दि.30) सकाळी उघडकीस आली. शेतीवरचे कर्ज व अन्य कर्जाची त्यांना चिंता लागलेली होती. यातच सध्याची दुष्काळजन्य परिस्थिती, पावसाअभावी शेतातील उभे सोयाबीन पीक जळत असल्याचे पाहून या चिंतेत आणखीनच वाढ झाली. सुगी तर हातची जाणार, आता आपण कर्ज कसे फेडावे या चिंतेने ग्रस्त होत या शेतकऱ्याने आपले जीवन संपविले आहे. त्यांच्या पश्चात आई, एक भाऊ, पत्नी,दोन मुले,एक मुलगी असा परिवार आहे.
घटनास्थळी तलाठी विष्णू गीते यांनी पाहणी करून पंचनामा केला. पोह तोटेवाड,पोह घरत, चालक गित्ते आदींनी भेट दिली आहे.
![](https://prajapatra.com/sites/default/files/styles/large/public/newproject-2023-01-17t144515-338-1673946934.jpg?itok=4kf4AYay)
बातमी शेअर करा