Advertisement

जुन्या वादाची कुरापत काढून ग्रामपंचायत सदस्याची तीक्ष्ण हत्याराने भोसकून हत्या

प्रजापत्र | Thursday, 06/10/2022
बातमी शेअर करा

अंबाजोगाई - शहरालगत असलेल्या चनई येथे बुधवारी (दि.०५) सकाळी ग्रामपंचायत सदस्याचा रेशन दुकानदारासोबत वाद झाला. या वादाची कुरापत काढून सायंकाळी त्या ग्रामपंचायत सदस्याची तीक्ष्ण हत्याराने भोसकून हत्या करण्यात आली. याप्रकरणी अंबाजोगाई शहर पोलीस ठाण्यात १७ जणांवर ॲट्राॅसिटीसह खुनाचा गुन्हा नोंदवण्यात आला आहे. 

 

 

गोरखनाथ सीताराम घनघाव (वय ४९, रा. चनई) असे त्या मयत ग्राम पंचायत सदस्याचे नाव आहे. गोरखनाथ नुकतेच ग्रामपंचायतच्या निवडणुकीत विजयी झाले होते. त्यांचा मुलगा रामधन यांच्या फिर्यादीनुसार, बुधवारी सकाळी १०.३० वाजताच्या सुमारास गोरखनाथ हे गावातील रमेश प्रल्हाद कदम याच्या स्वस्त धान्य दुकानात धान्य आणण्यासाठी गेले होते. तिथे रमेश कदम आणि त्याची मुले सुरज व धीरज यांनी गोरखनाथ यास तू ग्रामपंचायत सदस्य आहेस, तुला कशाला रेशन पाहिजे असे म्हणत जातीवाचक शिवीगाळ करत धक्के देऊन दुकानाबाहेर काढले. यावेळी रामधनचे आजोबा मधुकर बाबू मोरे (रा. चनई) यांनी मध्यस्थी करून भांडण मिटविले आणि गोरखनाथ शेतात गेले. शेतात असताना मनोज नवनाथ ईटकर याने गोरखनाथ यास सकाळी रमेश कदम याच्यासोबत झालेल्या भांडणावरून जातीवाचक शिवीगाळ करत धमकावले. त्यानंतर सायंकाळी साडेपाच वाजता रमेश कदम काही गुंडांना सोबत घेऊन गल्लीच्या टोकावर उभे राहून शिवीगाळ करत असल्याने गोरखनाथ आणि मधुकर गोरे तिकडे जाऊ लागले. यावेळी सिमेंट रोडवर मनोज ईटकर याने खंजीरसदृश्य चाकूने गोरखनाथ यांच्यावर वार करून त्यांना गंभीर  जखमी केले. तर नवनाथ मरगु ईटकर याने त्यांना विटाने आणि धीरज कदम याने लाथाबुक्क्यांनी गोरखनाथ यांना मारहाण केली. सुरज कदम याने कोयत्याने मधुकर मोरे यांच्या डोक्यात वार केला. यावेळी इतर हल्लेखोरांनीही त्यांना साथ दिली. तर, रमेश कदम हा यावेळी गोरखनाथ यांना जीवे मारण्यासाठी हल्लेखोरांना चिथावणी देत होता. भांडणाचा आवाज ऐकून इतर ग्रामस्थ धावत आले आणि त्यांनी सोडवासोडव करून जखमी गोरखनाथ व मधुकर यांना स्वाराती रुग्णालयात दाखल केले. तिथे उपचार सुरु असताना सायंकाळी गोरखनाथ यांचा मृत्यू झाला असे फिर्यादीत नमूद आहे. 

 

 

सदर फिर्यादीवरून मनोज नवनाथ ईटकर, नवनाथ मरगु ईटकर, धीरज रमेश कदम, सुरज रमेश कदम, रमेश प्रल्हाद कदम, प्रवीण उत्तम मिसाळ, आकाश नवनाथ ईटकर, रोहित अविनाश शिनगारे, शैलेश लहू मोरे, राहुल अंकुश क्षीरसागर, सिद्धेश्वर प्रकाश पांचाळ, शरद वैजनाथ ढगे, शुभम बंडू उमाप, धर्मराज ज्ञानोबा चौरे, सुरज नारायण उमाप, गोविंद नारायण उमाप आणि दगडू आत्माराम मोरे या १७ जणांवर अंबाजोगाई शहर ठाण्यात कलम ३०२, ३२६, ३२४, १२०-ब, १४३, १४७, १४८, १४९, ५०४ आणि ॲट्राॅसिटी कायद्यान्वये गुन्हा नोंदवण्यात आला. दरम्यान, शर पोलिसांनी आतापर्यंत सहा आरोपींना ताब्यात घेतले असून इतर फरार आरोपींचा कसून शोध सुरु आहे.

Advertisement

Advertisement