Advertisement

धारुर घाटात तिहेरी अपघात

प्रजापत्र | Monday, 15/11/2021
बातमी शेअर करा

किल्लेधारूर दि.15 नोव्हेंबर – धारूर घाटात आज सोमवारी सांयकाळी 5 च्या सुमारास कापूस घेऊन जाणाऱ्या ट्रकने दुचाकीस्वारास चिरडले. या अपघातात दुचाकीस्वार जागीच ठार झाला. घाटात अपघात होण्याची शृंखला सुरुच असून पुन्हा घाट रुंदीकरणाचा प्रश्न चर्चेत आला आहे.

 

सोमवार दि.15 रोजी सांयकाळी पाचच्या सुमारास केजहुन माजलगावकडे गणेश बाबूराव फरके वय 32 रा.केज हे आपल्या MH12 HJ2817 दुचाकीवरुन जात होते. धारुर घाटात माजलगावकडे कापूस घेवून जात असलेल्या MH20 DE 5487 या ट्रकने दुचाकीस चिरडले यात दुचाकीस्वाराचा जागीच मृत्यू झाला. अपघातस्थळी पोलिस दाखल झाले आहेत. क्रेन आणून नागरीकांच्या मदतीने मृतदेह बाहेर काढून वाहतूक सुरळीत करण्यात आली.

 

याचवेळी अपघातग्रस्त वाहनावर टेम्पो (MH04 H5119) धडकला. यामुळे बराच काळ वाहतूक ठप्प होती. अपघात होण्याच्या घटना सतत घडत असून रोजच्या अपघातामुळे या घाटात वाहनधारकात मात्र भिती निर्माण होत आहे.

 

धारूर येथील घाटामध्ये अरूंद रस्त्यामुळे दररोज अपघात होण्याची मालिका सुरू आहे. सतत होणाऱ्या अपघातामुळे वाहतूक विस्कळीत होत आहे. त्याचबरोबर जीव मुठीत धरून वाहन चालकांना प्रवास करावा लागत आहे.

 

धारूरचा घाट म्हणजे आता मृत्यूचा सापळा बनला आहे. या घाटाची रुंदीकरण करून त्वरित अपघाताची मालिका थांबवावी अशी मागणी अनेक दिवसांपासून होत आहे. परंतू सदरील घाट रुंदीकरणाच्या महत्त्वाच्या प्रश्नाकडे लोकप्रतिनिधी व प्रशासनाची कायम दिरंगाई होताना दिसून येत आहे.

 

Advertisement

Advertisement