Advertisement

लग्नासाठी प्रेमीयुगल थेट पाण्याच्या टाकीवर

प्रजापत्र | Monday, 15/11/2021
बातमी शेअर करा

बीड : लग्नाला घरच्यांकडून होकार मिळावा म्हणून प्रेमीयुगुलाने ‘शोले स्टाइल’ ड्रामा करत १० तास पाण्याच्या उंच टाकीवर ठिय्या मांडला. रात्री उशिरापर्यंत कुटुंब, पोलिस त्यांची समजूत काढत होते, यानंतर हे प्रेमीयुगल खाली उतरले. हा गोंंधळ रविवारी रात्री उशिरापर्यंत सुुुरु होता.

 

याबाबत माहिती अशी की, बीड शहरातील तरुण हा कामानिमित्त हिंगोलीत काही काळ वास्तव्यास होता. तिथे त्याची एका महिलेसोबत ओळख झाली. यानंतर दोघांमध्ये प्रेमसंबंध निर्माण झाले. दरम्यान याची माहिती कुटुंबीयांना झाली असता महिला विवाहित असून तिला दोन मुले आहेत, हे त्यांना कळाले. मात्र , ती पतीपासून दूर राहते. यामुळे मुलाच्या कुटुंबीयांनी मुलाला परत बीडला आणले होते. त्यानंतर सदरील तरुण पळून गेला होता. महिनाभरानंतर त्याला शोधून बीड येथे आणण्यात आले. दरम्यान रविवारी हिंगोलीहून बीडमध्ये आली. दुपारी साडेबारा वाजता तरुण व महिला शहरातील अंबिका चौक परिसरात असलेल्या अमृत अटल योजनेच्या टाकीवर चढले. मुलाने घरी फोन करून आपण टाकीवर चढलो असून आत्महत्या करत असल्याचे सांगितले. त्यानंतर कुटुंबीयांनी पाण्याच्या टाकीकडे धाव घेतली. आताच आमचे लग्न करून द्या म्हणत दोघांनी टाकीच्या शेवटच्या टोकावर जाऊन ठिय्या मांडला. दरम्यान शिवाजीनगर पोलिसांना याची माहिती झाल्यानंतर पोलिसही घटनास्थळी पोहचले. नगरसेवकही आले, बघता बघता बघ्यांची मोठी गर्दी झाली. सर्वांनी या प्रेमीयुगुलाची समजूत काढण्याचा प्रयत्न केला. रात्री उशिरापर्यंत हा गोंधळ सुरू होता. लग्न लावून देण्याची तयारी दर्शवली, यानंतर रात्री उशिरा हे प्रेमीयुगल खाली उतरले असल्याचे सांगितले जाते.

 

लग्नाची मागणी मान्य, नंतर मारहाणीची भिती…

सुरूवातीला या प्रेमीयुगुला आमचे लग्न लावून देत असाल तर खाली येतो असे सांगितले. पोलिस त्याला खाली उतरवण्यासाठी गेले तर मुलाने उडी मारण्याचा प्रयत्न केला. नंतर लग्न लावून देण्याची तयारी कुटुंबीयांनी दर्शवली. मात्र खाली झालेली गर्दी पाहून खाली आलो तर आपल्याला मारहाण होईल म्हणत हे युगुल टाकीवरून उतरण्यासाठी राजी होईना. मोबाइलवरून त्यांची समजूत काढल्यावर ते खाली उतरले.

Advertisement

Advertisement