Advertisement

आजपासून सरकारी कर्मचाऱ्यांच्या सुविधा बंद;

प्रजापत्र | Monday, 08/11/2021
बातमी शेअर करा

नवी दिल्ली दि.8 नोव्हेंबर – कोरोना महामारीच्या काळात सरकारी कर्मचाऱ्यांना देण्यात येणाऱ्या सुविधा आजपासून बंद करण्यात येत आहेत. आता सरकारी कर्मचाऱ्यांना कार्यालयात पूर्णवेळ हजेरी नोंदवावी लागणार आहे. हजेरी नोंदवण्यासाठी बायोमेट्रिक हजेरी प्रणाली आजपासून पूर्ववत करण्यात येत आहे.

 

भारत सरकारचे उपसचिव उमेश कुमार भाटिया यांच्या म्हणण्यानुसार, कोरोना महामारीच्या पार्श्वभूमीवर, कार्यालयात कर्मचाऱ्यांची संख्या कमी करणे आणि कामाचे तास कमी करणे यासारख्या सवलती आधीच रद्द करण्यात आल्या आहेत. आता 8 नोव्हेंबरपासून प्रत्येक कर्मचाऱ्याला बायोमेट्रिक हजेरी नोंदवावी लागणार आहे. बायोमेट्रिक हजेरीबाबत सर्व केंद्रीय कार्यालयांमध्ये नोटिफिकेशन  जारी करण्यात आले आहे.

 

केंद्र सरकारने  यासाठी संपूर्ण मार्गदर्शक तत्त्वेजारी केली आहेत. मार्गदर्शक तत्त्वानुसार बायोमेट्रिक मशीनजवळ सॅनिटायझर ठेवणे आवश्यक असेल. सर्व कर्मचारी हजेरी नोंदवण्यापूर्वी आणि नंतर सॅनिटायझरने हात स्वच्छ करतील. बायोमेट्रिक हजेरी नोंदवताना कर्मचाऱ्यांना आपापसात सहा फुटांचे अंतर राखावे लागेल. तसेच, सर्व कर्मचाऱ्यांना प्रत्येकवेळी मास्क  घालणे अनिवार्य असणार आहे.

 

बायोमेट्रिक मशीनचे टचपॅड वारंवार स्वच्छ करण्यासाठी नियुक्त कर्मचारी तैनात केले पाहिजेत. हे कर्मचारी हजेरी नोंदवण्यासाठी येणाऱ्या कर्मचाऱ्यांना कोरोना मार्गदर्शक  तत्त्वानुसार पालन करण्यासाठी मार्गदर्शनही करतील. बायोमेट्रिक मशीन संदर्भात सूचना देणारे परिपत्रक केंद्र सरकारकडून जारी करण्यात आले आहे. यात बायोमेट्रिक मशीन मोकळ्या वातावरणात ठेवावी. जर मशीन आत असेल तर त्याठिकाणी पुरेसे नैसर्गिक व्हेंटिलेशन असावे, असे म्हटले आहे.

Advertisement

Advertisement