Advertisement

एकाच कुटुंबातील तीन मुलांचा पाण्यात बुडून मृत्यू

प्रजापत्र | Saturday, 03/07/2021
बातमी शेअर करा

 

अहमदपूर-  तालुक्यातील शेंद्री सुनेगाव येथील मन्याड नदी पात्रात सख्खे बहिण भाऊ आणि त्यांचा चुलत भाऊ अशा एकाच कुटुंबातील तीन मुलांचा पाण्यात बुडून मृत्यू झाला आहे. ही घटना शनिवारी दुपारी घडली असून परिसरात शोककळा पसरली आहे.

 

 
शेंद्री- सुनेगाव येथील रोहिणी (छकुली ) ज्ञानोबा जायभाये (वय १४), प्रतिक ज्ञानोबा जायभाये (वय ९) आणि गणेश तुकाराम जायभाये (वय १२) हे तिघेजण शनिवारी दुपारी शेतालगत असलेल्या मन्याड नदीच्या काठावर शेळ्यांना चारण्यासाठी घेऊन गेले होते. शेळ्या चरत असताना नदीपात्राच्या कडेला लाकडाच्या ओंडक्यावर बसून ते खेळत होते. अचानक त्यांचा तोल गेला. त्यामुळे ओंडका पाण्यात उलटला आणि ते पाण्यात बुडाले. त्यामुळे त्यांचा मृत्यू झाला. शेंद्री- सुनेगाव व परिसरातील गावात बालकांच्या मृत्युची घटना समजताच घटनास्थळी गावकऱ्यांनी गर्दी केली होती. या घटनेमुळे परिसरात सर्वत्र हळहळ व्यक्त होत आहे.

 

 

घटनेचे वृत्त  समजताच या परिसरातील पोहण्यात तरबेज असणा-या व्यक्तींनी  व अग्निशामक दलाचे जवान यांनी तब्बल दोन तास अथक प्रयत्नानंतर  मुलांचे मृतदेह शोधून पाण्याबाहेर काढले. यावेळी किनगाव, अहमदपूर पोलीस कर्मचारी उपस्थित होते. या मुलांचे शवविच्छदन ग्रामीण रुग्णालय अहमदपूर येथे करण्यात आले असून मृतदेह कुटुंबियांच्या ताब्यात देण्यात आले आहेत.

Advertisement

Advertisement