Advertisement

मेरी दोस्ती मेरा प्यार…

प्रजापत्र | Sunday, 02/08/2020
बातमी शेअर करा

दासू भगत

१९६२ मध्ये राजश्री प्रॉडक्शनचे सर्वेसर्वा ताराचंद बडजात्या यांनी एका बंगाली चित्रपटाचा रिमेक करण्याचे ठरविले. बंगाल, महाराष्ट्र आणि तमिळनाडू हे त्या काळातील चित्रपट निर्मितीचे दर्जेदार स्त्रोत होते. त्यामुळे या राज्यातील हिट चित्रपटांचे रिमेक करणे ही एक व्यावसायिक खेळी असे. १९५९ मध्ये बंगाली भाषेतील “लालू भूलू” चित्रपटाने चांगलीच प्रसिद्धी मिळविली होती. ताराचंद्र बडजात्यानां या चित्रपटाचा हिंदीत रिमेक करायचा होता. या चित्रपटासाठी १७-१८ वर्षांचे दोन नवीन तरूण त्यानां हवे होते. मग या तरूणांचा शोध सुरू झाला. त्यांची मुलगी राजश्रीने एका तरूणाचे नाव सुचविले.  काही दिवसांनी दुसराही तरूण मिळाला. मग या दोघानां बडजात्या चित्रपट दिग्दर्शक सत्येन बोस यांच्याकडे घेऊन गेले. त्यांचा मेकअप करून स्क्रीनटेस्ट घेण्यात आली. आणि या चित्रपटाच्या चित्रीकरणाला सुरूवात झाली. हे दोघेही तरूण वेगवेगळ्या पार्श्वभूमितुन आलेले होते. जवळपास दोन वर्षे ते दोघे या चित्रपटाच्या निमित्ताने एकत्र आले आणि कौटुंबिक मित्रही झाले. 


१९६४ मध्ये जेव्हा हा  चित्रपट प्रदर्शीत झाला तेव्हा त्याने अनेक विक्रम रचले. चित्रपटाचे नाव होते “दोस्ती”. यातील या दोन मित्रांच्या भूमिका केल्या होत्या सुशील कुमार आणि सुधीर कुमार या दोघा अभिनेत्यांनी.  त्याकाळात चित्रपट एकाचवेळी सर्वत्र प्रदर्शीत होत नसत. वर्ष दिड वर्षानंतर छोट्या शहरात रिलीज होत. पण यातील गाण्यांनी मात्र आगोदरच सर्वांना वेड लावले होते. या चित्रपटाला फिल्म फेअरचे- उत्कृष्ट चित्रपट, उत्कृष्ट कथा(बाणभट),उत्कृष्ट संवाद लेखन(गोविंद मुनीस), उत्कृष्ट संगीतकार(लक्ष्मीकांत प्यारेलाल), उत्कृष्ट पार्श्व गायक (मंहमद रफी), उत्कृष्ट गीतकार(मजरूह सुलतानपूरी) असे  सहा पुरस्कार मिळाले. खरं तर ६० च्या दशकात चित्रपट सप्तरंगी झाला होता. हलक्या फुलके कथानक, सुमधूर संगीत, गाजलेल्या नायक नायिकेच्या जोडया, नयनरम्य स्थळांवर चित्रीकरण, विनोदांची पेरणी, शेवटची हाणामारी असा सर्व मसाला असलेल्या गर्दीत दोस्ती सर्वस्वी वेगळा होता. मुळात या चित्रपटाचा खरा नायक “मैत्री” हाच होता. कथा खरोखरंच अत्यंत साधी, संवादही मनाला सहज स्पर्शणारे, अख्खा चित्रपट शाळा, शहरातील गल्ल्या आणि झोपडीवजा घरात चित्रीत केलेला. सोकॉल्ड हिरॉईन वा प्रेमाबिमाची त्रिकोण नाही, गाणी म्हणत झाडामागे धावणे नाही की कोणताही क्रूर खलनायक नाही. एक नेत्र नसलेला पण दृष्टी असलेला तर दुसरा एक पाय नसलेला पण अफाट जिद्द असलेला असे दोन मित्र. जोडीला एक शाळा मास्तर, एक प्राचार्य, एक या मुलानां प्रेम लावणारी म्हातारी, भावाची ताटातूट झालेली बहिण,  एक आजारी छोटी मुलगी आणि शाळेतील मुलं…बस्स. एवढेच पात्रे. पण यातील कथेने सर्व प्रेक्षकानां बांधून ठेवले. संवादानी मनात घर केले तर गाण्यांनी हृदयात ठाण मांडले.


 या चित्रपटातील सर्वच अंगावर भरभरून बोलले आणि लिहीले गेले मात्र यातील जे दोन मित्र ज्यांनी साकारले त्यावर फारसे काही वाचायला व ऐकायला मिळाले नाही. गमंत म्हणजे या दोन अभिनेत्याचा खून झाला अशा अफवा पसरवल्या गेल्या. अशी अफवा का पसरली असेल? हे एक कोडेच आहे. कारण हे दोन्ही अभिनेते काही कसलेले कलावंत नव्हते की ज्याच्यांमुळे कुणाचे करीअर धोक्यात येईल. शिवाय दोघेही खूपच नवखे तरीही अशी अफवा का? याचे कोडे आजतागयत नाही सुटू शकले. मात्र या चित्रपटाच्या कथेची जी एक मागणी होती त्यात हे दोघेही नैसर्गिक वाटले व भूमिकेत चपखल बसले. मला यातला नेत्रहीन म्हणजे सुधीर कुमार खूप भावला. त्याच्या चेहऱ्यातच एक निरागसता होती शिवाय तो खरोखरच आंधळा आहे असेच वाटत असे. दोघांनीही कुठेही भडक अभिनय केला नाही त्यांचे सवांद आजही अगदी सहज वाटतात. चित्रपटामुळे दोघांनाही चांगली प्रसिद्धी मिळाली पण तीन वर्षांनंतर हे दोघेही गायबच झाले ते कायमचेच. मग त्यांचे झाले तरी काय? नंतर कुठल्याच सिने मासिकात त्यांचे चेहरे झळकले नाही की दोन ओळीची बातमी छापून आली नाही….
 जेव्हा जेव्हा हा चित्रपट आठवला जात असे तेव्हा तेव्हा मला या दोन्ही अभिनेत्याचे पूढे काय झाले याची कायम उत्सुकता वाटत असे…अगदी त्यांची खरी नावेही माहित नव्हती…..मग अचानक नेट खंगाळताना एक दिवस २०१४ मध्ये प्रसिद्ध झालेला श्री शिशीर कृष्ण शर्मा यांचा एक लेख माझ्या हाती आला आणि अनेक बाबी नव्याने माहित झाल्या. यातुन अनेक नवीन बाबींचा उलगडा झाला. सुशील कुमारचे पूर्ण नाव सुशील कुमार किशनचंद सोमया. कराची येथे ४ जुलै १९४५ मध्ये एका सिंधी कुटूंबात त्याचा जन्म झाला. अनेक कुटूंबियाना फाळणीचा अंधकारमय प्रवास करावा लागला. तो सोमया कुटुंबालाही करावा लागला. सर्व काही कराचीत सोडून ते आगोदर गुजरातच्या नवसारी मध्ये विस्थापित झाले व नंतर मुंबईतील माहिम भागात स्थिरावले. एकदा किशनचंद यांचे एक मित्र किशनलाल बजाज अचानक घरी आले. चित्रपटातुन लहान भूमिका ते करत असत. ते सुशील कुमारच्या आईला म्हणाले- “की मला २० टक्के कमिशन देत असाल तर मी सुशीलला चित्रपटात काम मिळवून देतो.” सिंधी व मारवाडी समाज बहुतांश व्यापार करणारा समाज आहे. आर्थिक व्यवहार करताना मैत्री आडवी येणार नाही याची ते विशेष खबरदारी घेतात. सुशीलच्या आईने ते मान्य केले व १३ वर्षांच्या सुशीलला पहिला चित्रपट मिळाला ज्याचे नाव होते “अबाना” हा चित्रपट सिंधी भाषेत होता. 


नंतर फिर सुबह होगी, धूल का फूल,मैने जिना सिख लिया, काला बाजार, श्रीमान सत्यवादी,दिल भी तेरा हम भी तेरे, संजोग, संपूर्ण रामायण, एक लडकी सात लडके, फूल बने अंगारे असे चित्रपट त्याला मिळाले. किशनचंदच्या संसार गाड्यात सुशीलही मदत करत होता. १९६२ मध्ये दोस्ती हा चित्रपट मिळाला ज्यात तो प्रमूख भूमिकेत झळकला. इथेच त्याची भेट सुधीर कूमार सोबत झाली व दोन वर्षाच्या सहवासात ते एकमेकांचे कौटुंबिक मित्रही झाले.
 सुधीर कुमारचे पूर्ण नाव सुधीर शंकर सावंत.  लालबाग मधील जुन्या हाजी कासम चाळीत रहायचा.  लालबाग परळ या मुख्यत्वे गिरणी कामगार मोठ्या प्रमाणात राहत असलेल्या परीसरात सुधीर मोठा झाला. आई वडील आणि मोठी बहिण शोभा व लहान बहिण चित्रा असे चौकोनी कुटंब. सुधीरचे प्रभाकर नावाचे मामा व्ही.शांताराम यांच्या राजकमल स्टुडिओत मूख्य मेकअप आर्टीस्ट होते त्यामुळे त्याचे स्टुडियोत जाणे येणे स्वाभाविक होते. याच संबंधातुन सुधीरला “संत ज्ञानेश्वर” आणि “दोस्ती” चित्रपटात भूमिका मिळाली. खरे तर या दोघानां पुन्हा एकत्र घेऊन ताराचंद बडजात्या यांनी काम सुरू केले होते. ३५०/-रूपये प्रति महीना असा करार पण करण्यात आला. पण याच वेळी ए.व्ही.एम. या दक्षिणेतल्या मोठ्या चित्रपट संस्थेने सुधीर कूमारला एक मोठी ऑफर दिली व  ती स्विकारल्यामुळे ताराचंद यांनी सुधीरचे सर्व करार रद्द केले शिवाय नुकसान भरपाई देखिल घेतली. करार रद्द झाल्यामुळे सुशील कुमारचेही काम हातून गेले. 
ए.व्ही.एम.चा “लाडला” हा चित्रपट १९६६ मध्ये प्रदर्शित झाला. यामध्ये तो रोमॅटिंक हिरो होता. लाडात वाढलेला श्रीमंत घरातील मुलगा अशी त्याची भूमिका होती. मात्र यात त्याचे विशेष अभिनय कौशल्य नाही दिसले. १९६८ मध्ये राजदत्त दिग्दर्शीत “घरची राणी” या चित्रपटात सुधीर कूमार बाळा साहेब सरपोतदार या टिपीकल मराठमोळ्या मूख्य भूमिकेत होता. मात्र चित्रपट स्त्रीप्रधान नायिकेचा होता. अनुपमा या अभिनेत्रीने यात नायिकेची भूमिका साकारली. या नंतर सुधीर कूमार अखेरचे दिसला तो “जिनेकी राह” या चित्रपटात. यात संजीवकुमारच्या लहान मुक्या भावाची एक लहानशी भुमिका होती….नंतर मात्र सुधीर कुमार पडद्याआड गेला आणि लोकही सपशेल विसरून गेले.


१९६५ मध्ये मॉस्को येथे अंतरराष्ट्रीय बालचित्रपट महोत्सवात “दोस्ती” चित्रपटाची निवड झाली होती. सुशीलकुमार या चित्रपटाचे प्रमोशन करण्याकरीता मस्कोला गेला होता. परत आल्यावर राजश्रीच्या पूढच्या चित्रपटासाठी सुधीर आणि सुशीलचा करार झाला होता पण सुधीरने लाडला चित्रपटासाठी हा करार मोडला. सुशीलला परत आल्यावर हे समजले. ताराचंद बडजात्यांनी त्याला स्वतंत्रपणे पुन्हा संधी देण्याचे ठरविले होते पण तो योग १९६९ मध्ये आला. तत्पूर्वी १९६५ मधील “सहेली” नावाच्या एका चित्रपटात सुशील कुमार २०-२५ सेंकद पडद्यावर एका टपोरी पोराच्या भूमिकेत दिसला. १९६९ मध्ये राजश्रीच्या “तकदीर” या चित्रपटात सुशील कुमारची बऱ्यापैकी मोठी भूमिका होती. राजश्रीच्या या चित्रपटातील सर्वच गाणी सुंदरच होती. यातील “जब जब बहार आयी….मुझे तुम याद आए…” या गाण्याचे दोन कडवे त्याच्यावर चित्रीत झाले. नंतर सुशील कुमार  देव आनंद यांच्या “हिरा पन्ना” या चित्रपटात काही मिनिटांसाठी दिसला. त्यावेळी तो विमान कंपनीत नोकरीला लागला होता आणि चित्रपटात तो स्टाफचाच व्यक्ती होता. मग अखेरचा दिसला तो १९७४ च्या “सुहानी रात” नावाच्या चित्रपटात. मात्र हा चित्रपट आला कधी अन् गेला कधी हे फक्त् त्या निर्मात्यालाच ठावूक. 
या दोन अभिनेत्यांच्या अभिनया बद्दल लिहावे इतपत मोठे ते नाहीत हे जरी मान्य केले तरी या एका चित्रपटासाठी हे दोघेही  लाखो प्रेक्षकांच्या आजही लक्षात आहेत. अर्थात या चित्रपटाच्या यशाचे खरे शिल्पकार ताराचंद बडजात्या हेच आहेत. ते खरोखर दूरदर्शी होते. चित्रपट या कलेचा व्यवसाय कसा करायचा हे त्यानां उत्कृष्ट माहित होते. संवाद, गाणी, संगीत याचे महत्व आणि अचूक निवडीतही ते माहीर होते. सुशील आणि सुधीर या दोघानांही आर्थिक् परिस्थितीने या मोहमयी जगात आणले. त्यांना स्वत:ला अभिनयाची अत्यांतिक आवड असावी असे वाटत नाही. कारण नंतर दोघांनीही स्वत: होऊन् कधी कुणाकडे खेटे घातले नाही.

सुशील कुमारने नंतर जयहिंद कॉलेज मुंबईतुन पदवी मिळवली आणि १९७१ मध्ये एअर इंडियात नोकरी मिळवली. १९७८ मध्ये त्याने आपली बालपणीची मैत्रीण कोशी कोटवानी हिच्या बरोबर लग्न केले. सन २००३ मध्ये तो निवृत्त झाला. एकदा भारतात परत येताना सुशील कुमारला सुधीर कुमारच्या निधनाची बातमी समजली. सुधीरचा मृत्यू अत्यंत हृदयद्रावक पद्धतीने झाला होता.
 सुधीर कुमारने ६० चे दशक संपताना श्रद्धा नावाच्या मुलीशी लग्न केले मात्र त्या नंतर त्याला ऑफर्स मिळणे बंद झाले. मग त्यानेही कुणाकडे कामासाठी विचारणा केली नाही. हळूहळू तो चित्रपटसृष्टीला आणि चित्रपटसृष्टी त्याला विसरून गेले. एक दिवस घरी जेवण करत असतानां त्याच्या घशात  चिकनचे हाड अडकले व जखम झाली. ही जानेवारी १९९३ मधील घटना. दूर्देवाने याच काळात मुंबईत हिंदू मुस्लिम दंगल झाली. शहरात त्यावेळी संचारबंदी होती त्यामुळे सुधीरला डॉक्टरांकडे घेऊन जाता आले नाही. घशातल्या जखमेने गंभीर रूप धारण केले. जेवण करणे दुरापस्त झाले. दंगल शमल्यावर टाटा हॉस्पिटलमध्ये त्याला दाखल करण्यात आले. तो पर्यंत जखम खूपच चिघळली होती. नळीद्वारे अन्न देण्याचा प्रयत्नही फारसा कामी आला नाही व शेवटी त्यातच त्याचे निधन झाले. 
आज दोघेही पूर्णपणे विस्मृतीत गेले आहेत. मला व्यक्तीशा सुधीर कूमार हा मराठी अभिनेता होता हे पहिल्यांदाच समजले आणि मराठी अस्मिता न कळत चाळवली गेली. चित्रपटसृष्टीतीलच नव्हे तर एकूणातच काळाच्या स्मृतीत कधी ना कधी आपण गडप होणारच हे सत्य आहे. केवळ एका चित्रपटामुळे हे दोघेही चित्रपटसृष्टीत ठळकपणे नोंदले गेले ते कायमचेच. आज इतक्या वर्षानंतरही  या चित्रपटाचे विस्मरण रसिकानां होत नाही. आज जगभरातून फ्रेन्डशीप डे सारा केला जातोय. आपल्या विस्मृतीतून कधीच डिलीट न होणारा डेटा म्हणजे बालपणीचे मित्र - संवगडी….शरीर कितीही जर्जर होवो मनाला सदैव जीवंत ठेवणारा झरा म्हणजे मित्रच…वर्ण धर्म जात लिंग यांचे कुपंण तोडण्याची मेगा शक्ती मैत्री नावाच्या अस्त्रातच असते……कोणत्याही नामवंत कलावंता शिवाय अफाट लोकप्रिय झालेला..संगीतधारांनी न्हाऊ घालणारा ‘दोस्ती’ चित्रपट असा अचानक स्मृतीतून बाहेर आला.


 
 

Advertisement

Advertisement