Advertisement

  औरंगाबाद पाठोपाठ 'या' शहरामध्येही लॉकडाऊनची शक्यता

प्रजापत्र | Monday, 08/03/2021
बातमी शेअर करा

: नगर जिल्ह्यात करोना रुग्ण वाढीचा वेग आता तिप्पट झाला आहे. त्यामुळे औरंगाबाद पाठोपाठ आता नगर जिल्ह्यातही दक्षता घेण्यात येत आहे. मुख्यमंत्री उद्धव ठाकरे सोमवारी सायंकाळी सहा वाजता जिल्हा प्रशासन आणि आरोग्य विभागाच्या अधिकाऱ्यांशी संवाद साधणार आहेत. त्यामुळे या बैठकीत काय निर्णय होतो, याकडे लक्ष लागले आहे. 

फेब्रुवारी महिन्यात खाली आलेले करोनाचे आकडे मार्चमध्ये वाढतच आहेत. फेब्रुवारीच्या पहिल्या आठवड्यात नवे रुग्ण वाढीची दैनंदिन संख्या ४५ पर्यंत खाली आली होती. आता ती ३६२ वर गेली आहे. मार्चच्या पहिल्या दिवसापासून हा आकडा दोनशेच्या पुढे कायम असून त्यात दररोज वाढच होत आहे. मृत्यूचे प्रमाणही वाढले आहे. सध्या १६३६ रुग्णांवर उपचार सुरू आहेत. दररोज बरे होऊन परतणाऱ्या रुग्णांच्या तुलनेत नव्याने दाखल होणाऱ्या रुग्णांची संख्या अधिक आहेत. फेब्रुवारी अखेर नवीन येणाऱ्या रुग्णांची सरासरी संख्या शंभर होती. आता ती तीनशेवर गेली आहे. त्यामुळे नगर जिल्ह्यातील स्थिती गंभीर वळणावर असल्याचे दिसून येते.

या पार्श्वभूमीवर मुख्यमंत्री ठाकरे यांनी सोमवारी सायंकाळी सहा वाजता जिल्ह्यातील अधिकाऱ्यांसोबत आढावा बैठक आयोजित केली आहे. अधिकाऱ्यांनी केलेल्या उपाययोजनांचा आढावा घेऊन मुख्यमंत्र्यांकडून काही सूचना दिल्या जाण्याची शक्यता आहे. शेजारच्या औरंगाबाद जिल्ह्यात अंशत: लॉकडाऊनचा निर्णय झाला आहे. लोकसंख्येच्या तुलनेत दोन्ही ठिकणाची रुग्ण संख्येची परिस्थिती सारखीच असल्याचे दिसून येते. त्यामुळे नगरच्या बाबतीत आता काय निर्णय घेतला जातो, याकडे लक्ष लागले आहे. गेल्या महिन्यात मुख्यमंत्र्यांनी नागरिकांना आवाहन करून स्वत: दक्षता घेत करोनाला अटकाव करण्याचे आवाहन केले होते. त्यानंतर आठ दिवसांनी परिस्थिती पाहून आपण निर्णय घेऊ, असेही ते म्हणाले होते. त्यामुळे आता आढावा बैठकांमधून ते काय सूचना देतात, त्यानंतर प्रशासनाकडून काय निर्णय घेतले जातात, याकडे लक्ष लागले आहे. नगर जिल्ह्यात सध्या रात्रीची संचारबंदी आहे. लग्न आणि अन्य कार्यक्रमांवर निर्बंध आहेत, मात्र, दंड केला जात असला तरीही लग्न समारंभ सुरूच आहेत. धार्मिक स्थळे, शाळा-महाविद्यालये, सार्वजनिक वाहतूक सुरूच आहे. केंद्रीय समितीने लग्न, कार्यक्रम, निवडणुका आणि सावर्जनिक वाहतूक यामुळे करोना वाढत असल्याचा अहवाल दिला आहे. त्यामुळे यासंबंधी काय निर्णय होतो, याकडे लक्ष आहे.

Advertisement

Advertisement