Advertisement

राज्यातील 'या' तीन जिल्ह्यांत पुन्हा लॉकडाऊन?

प्रजापत्र | Friday, 19/02/2021
बातमी शेअर करा

 मुंबईः राज्यात पुन्हा एकदा करोना रुग्णसंख्या वाढू लागली आहे. १ फेब्रुवारीपासून नवीन बाधित रुग्णांच्या संख्येत लक्षणीय वाढ झाली आहे. त्याबाबत माहिती देतानाच उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी अमरावती, यवतमाळ, अकोला या तीन जिल्ह्यांत पुन्हा लॉकडाऊन लागू शकतो, अशी शक्यता व्यक्त केली आहे. आज प्रसारमाध्यमांशी बोलताना अजित पवारांनी राज्यातील करोना परिस्थीतीबाबत भाष्य केलं आहे.

राज्यात गेले काही दिवस करोनाचा प्रादुर्भाव वाढत आहे. मुंबई, पुणे या शहरांच्या तुलनेत इतर जिल्ह्यांत करोनाचा संसर्ग अधिक फैलावत असल्याचं निदर्शनास आलं आहे. विशेषत: ग्रामीण भागात करोना रुग्णवाढ दिसून येत आहे. त्यावर बोट ठेवत अजित पवार यांनी पुन्हा लॉकडाऊनचे संकेत दिले आहे.
'करोना रुग्णांची संख्या वाढत आहे. अकोला, अमरावती, यवतमाळ या शहरात लॉकडाऊन लावायचा विचार आहे. मुंबईपेक्षा जास्त रुग्णसंख्या अमरावतीत दिसतेय. अमरावती विभागात जास्त रुग्णसंखेत वाढ होत असल्याचं समोर आलं आहे. त्यामुळं या तीन जिल्ह्यांत पुन्हा लॉकडाऊन लावण्याचा विचार करत आहोत. अकोला, यवतमाळ आणि अमरावतीत सध्या काय परिस्थिती आहे याबाबत आज अढावा बैठक होणार आहे. या बैठकीनंतर या तीन जिल्ह्यांत काय निर्णय घेणार हे समोर येईल,' असं अजित पवार यांनी स्पष्ट केलं आहे. तसंच, 'लॉकडाऊनबाबत अकोला, अमरावती आणि यवतमाळच्या पालकमंत्र्यांशी माझं बोलणं झालंय,' असंही त्यांनी नमूद केलं आहे.

'अमरावतीत रुग्णसंख्या वाढली आहे. जवळपास संपूर्ण कुटुंबाला करोना ग्रासलं आहे. त्याच्यानंतर मी मुख्यमंत्र्यांशी बोललो आहे. मुख्यमंत्र्यांनी सर्व माहिती घेऊन सार्वजनिक आरोग्य विभागाचे सचिव आणि संबंधित अधिकाऱ्यांना बैठकीसाठी बोलावलं आहे. या बैठकीत या तीन शहरांसाठी काय निर्णय घ्यायचा? त्यात ग्रामीण भागही घ्यायचा का? यासंबंधी चर्चा होणार आहे, असं अजित पवार म्हणाले आहेत.'करोना रोखण्यासाठी खबरदारी घेऊन निर्णय घेण्यात येणार आहे. १ फेब्रुवारीपासून रुग्णसंख्या वाढत आहे, लोक मास्क लावत नाहीत. नियम पाळले नाहीत तर लॉकडाऊन लागू शकतो आणि निर्बंधही अधिक कठोर करण्यात येतील,' असा इशारा अजित पवार यांनी दिला आहे.

Advertisement

Advertisement