बीड दि.४(प्रतिनिधी):वाहतूक शाखेचे प्रमुख म्हणून वैभव पाटील यांनी कारभार हाती घेतल्यानंतर बेशिस्त वाहनचालकांना शिस्त लावण्यासोबत नियमांचे उल्लंघन करणाऱ्या मुजोर रिक्षाचालकांना त्यांनी कारवाईचा दणका दिला आहे.एकाच रात्रीतुन जवळपास दीड लाखांचा दंड वाहतूक शाखेच्या टीमने वसूल केला आहे.
बीड जिल्ह्यात वाहनांचा प्रश्न कायम चर्चेत असतो.कधी वाहतुकीचा खोळंबा तर कधी बेशिस्त वाहतूकरदारांचा त्रास.त्यापार्श्वभूमीवर वैभव पाटील यांनी पदभार घेतल्यापासून जिल्ह्यातील वाहनधारकांना शिस्त पाळण्याचे आवाहन करत बेशिस्त धारकांवर दंडात्मक कारवाई देखील सुरु केली आहे.चार दिवसांपूर्वी वाहतूक शाखेने 'जीव तुमचा आहे आणि नियम ही तुमच्यासाठी'म्हणत अनोखी जनजागृती केली होती.त्यांच्या या अभिनव जागृतीची जिल्ह्यात देखील चर्चा झाली.हेल्मटसक्ती वाहनधारकांच्या जीवासाठी महत्वाची असल्याचा संदेश या मोहिमेतून देण्यात आला होता.त्यानंतर बुधवारी नियमांचे पालन न करणारे,वाहतुकीसाठी अडथळा ठरणारे अनेक रिक्षा वाहतूक पोलिसांनी ताब्यात घेतले होते.त्यानुसार रात्री या वाहनांवर दंड लावत तब्बल दीड लाखांचा दंड वसूल करण्यात आला.वैभव पाटील यांच्या या कारवाईचे सामन्यांमधून कौतुक करण्यात येत आहे.नियमांचे पालन न करणाऱ्या वाहनांवर अश्याच कारवाया सुरु राहतील असा इशारा देखील त्यांनी दिला आहे.

बातमी शेअर करा
