Advertisement

बारावीचा निकाल जाहीर यंदाही मुलींनीच मारली बाजी

प्रजापत्र | Saturday, 02/05/2026
बातमी शेअर करा

 पुणे : महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळातर्फे फेब्रुवारी-मार्च २०२६ मध्ये घेतलेली बारावीची परीक्षा १४ लाख ३३ हजार ५७ विद्यार्थ्यांनी दिली. त्यातील १२ लाख ८६ हजार ८४३ म्हणजेच तब्बल ८९.७९ टक्के विद्यार्थी परीक्षेत उत्तीर्ण झाले आहेत. यंदाही मुलींनीच मारली बाजी मात्र, गेल्यावर्षीच्या (२०२५) तुलनेत यंदा निकालात २.०९ टक्क्यांनी घट झाल्याचे दिसून आले आहे.

   बहुप्रतिक्षेत असलेला राज्य मंडळाचा बारावीचा निकाल शनिवारी (ता.२) जाहीर झाला. यात राज्यातील नऊ विभागीय मंडळांमधून सर्व शाखांच्या १४ लाख ४४ हजार ७१३ नियमित विद्यार्थ्यांनी नोंदणी केली. राज्यात कोकण विभागाचा निकाल ९४.१४ टक्के असा सर्वाधिक असून लातूर विभागाचा ८४.१४ टक्के असा सर्वात कमी निकाल आहे.तर, उत्तीर्ण मुलींच्या निकालाची टक्केवारी ९३.१५ टक्के असून मुलांचा निकाल ८६.८० टक्के आहे. उत्तीर्ण मुलींच्या निकालाची टक्केवारी मुलांपेक्षा तब्बल ६.३५ टक्क्यांनी जास्त आहे.या परीक्षेसाठी ५९ हजार ८७६ पुनर्परीक्षार्थी विद्यार्थ्यांनी नोंदणी केली होती. त्यापैकी ५० हजार ३४६ विद्यार्थ्यांनी परीक्षा दिली. त्यापैकी १८ हजार ३४९ विद्यार्थी (३६.४४ टक्के) उत्तीर्ण झाले आहेत. तर, खासगी विद्यार्थी म्हणून नोंदणी केलेल्या विद्यार्थ्यांपैकी ३६ हजार ९४१ विद्यार्थ्यांनी परीक्षा दिली असून त्यातील २९ हजार ६३४ विद्यार्थी (८०.२१ टक्के) उत्तीर्ण झाले आहेत.राज्यात आठ हजार ३६७ दिव्यांग विद्यार्थ्यांनी परीक्षा दिली असून त्यातील सात हजार ५७९ (९०.५८ टक्के) उत्तीर्ण झाले आहेत, अशी माहिती राज्य मंडळाचे अध्यक्ष त्रिगुण कुलकर्णी यांनी पत्रकार परिषदेत दिली. यावेळी शिक्षण आयुक्त सचिंद्र प्रताप सिंह, सचिव डॉ. दीपक माळी यांसह अन्य अधिकारी उपस्थित होते.

 

निकाल पाहण्यासाठी अधिकृत संकेतस्थळे
विद्यार्थ्यांना खालील अधिकृत वेबसाइट्सवर निकाल पाहता येणार आहे :

hscresult.mahahsscboard.in

hscresult.mkcl.org

mahahsscboard.in

तसेच, डिजिलॉकरवरही निकालाची माहिती उपलब्ध होणार आहे.

Advertisement

Advertisement