नागपुर: नाशिकमधील वादग्रस्त भोंदू बाबा अशोक खरात याच्या लैंगिक अत्याचार प्रकरणामुळे राजकीय वर्तुळात खळबळ उडाली आहे. या प्रकरणात काल रूपाली चाकणकर यांनी राज्य महिला आयोगाच्या अध्यक्षपदाचा राजीनामा दिला. या राजीनाम्यावरून राज्याचे राजकारण तापले आहे. काँग्रेस नेते विजय वडेट्टीवार यांनी आज नागपुरात पत्रकारांशी बोलताना सरकारवर गंभीर आरोपांच्या फैरी झाडल्या. "अशोक खरातच्या संपर्कात आलेल्या सर्व 'नवरत्नां'चे आणि मंत्र्यांचे सीडीआर तपासा, म्हणजे महाराष्ट्राला सत्य कळेल," अशी मागणी त्यांनी केली आहे.
रूपाली चाकणकर यांच्या राजीनाम्यावर बोलताना वडेट्टीवार म्हणाले की, "ज्या पदावर त्या काम करत होत्या, तिथे राहून भोंदू बाबाची मानसिक गुलामी पत्करणे अशोभनीय होते. ज्यांचा विश्वास अनिष्ट प्रथांवर आहे, त्या महिलांना न्याय देऊ शकत नाहीत. खरातचे पाय धुणे, त्याची छत्री धरणे अशा कृत्यांमुळे त्यांची उंची कमी झाली होती, म्हणूनच त्यांना राजीनामा द्यावा लागला."
खरात प्रकरणातील नीरज जाधवला झालेल्या अटकेवर वडेट्टीवार यांनी संशय व्यक्त केला. "ज्याने हे प्रकरण उघडकीस आणलं, त्यालाच अटक करणं म्हणजे मोठे मासे वाचवण्यासाठी सुरू असलेला प्रयत्न आहे. सरकार स्वतःची अब्रू वाचवण्यासाठी खरातला वाचवत आहे. या प्रकरणात ५६ पेक्षा जास्त व्हिडीओ आहेत, जे माणसाला लाज वाटायला लावणारे आहेत," असा खळबळजनक दावा त्यांनी केला.अशोक खरात हा लोकांच्या पाण्यात 'वायग्रा' किंवा गुंगीची औषधे टाकून अत्याचार करत असल्याचा गंभीर संशय वडेट्टीवार यांनी व्यक्त केला. "पाण्यात काय काय मिसळले होते आणि गुंगी आल्यावर कोणासोबत काय कृत्य केले, याची चौकशी झाली पाहिजे. या खरातची वरात आम्ही सोमवारी विधानसभेत काढू," असा इशारा त्यांनी दिला.
बड्या मंत्र्यांच्या चौकशीची मागणी
या प्रकरणात केवळ चाकणकरच नाही, तर विद्यमान मंत्रिमंडळातील अनेक मंत्री, राधाकृष्ण विखे पाटील यांच्यासारख्या नेत्यांचेही फोटो दिसत असल्याचे सांगत वडेट्टीवारांनी सर्वांच्या चौकशीची मागणी केली."एपस्टिन फाईलमध्ये नाव आलेल्यांना पदावर राहण्याचा अधिकार नाही, नाशिकचे प्रकरणही तसेच आहे," असेही ते म्हणाले.

