मुंबई : गेल्या काही दिवसांपासून राज्यातील हवामान पूर्णपणे कोरडे आहे. नैऋत्य मोसमी पावसाने राज्यातून निरोप घेतला. मात्र, १५ ऑक्टोबरपासून राज्यातील हवामानात परत एकदा बदल अपेक्षित आहे. या तारखेपासून किमान १८ ऑक्टोबरपर्यंत विदर्भ, मराठवाडा आणि मध्य महाराष्ट्रात आभाळी हवामान आणि दुपार नंतरचा वादळी पाऊस अपेक्षित असल्याचे हवामान विभागाकडून स्पष्ट करण्यात आले. या पार्श्वभूमीवर प्रशासनाने शेतकऱ्यांना सतर्कतेचा इशारा दिला आहे.
राज्यात यंदा पावसाने धुमाकूळ घातला. अनेक भागात अतिवृष्टी होऊन पूरपरिस्थिती निर्माण झाली होती. शेतकऱ्यांची उभे पिके पाण्यात वाहून गेली असून अतोनात नुकसान झाले. सध्या मोसमी पावसाने राज्यात निरोप घेतला आहे. पूरपरिस्थितीतून सर्व जण सावरत असतांना आता पुन्हा एकदा अवकाळीचे संकट निर्माण झाले. सध्याच्या अंदाजानुसार वादळी पावसाची सर्वात अधिक शक्यता आणि प्रमाण हे विदर्भ आणि मराठवाड्यात असू शकते.या दरम्यान अनेक भागांमध्ये आभाळी हवामान अथवा वादळी पावसाची शक्यता राहील. तुलनेत खान्देश आणि मध्य महाराष्ट्रात विखुरलेल्या स्वरूपाचा वादळी पाऊस पडू शकतो, असे हवामान विभागाकडून सांगण्यात आले. शेतकऱ्यांनी हवामानाच्या या स्थितीनुसार नियोजन करावे आणि काढणी केलेल्या पिकांना वादळी पाऊस आणि वाऱ्यापासून सुरक्षित ठेवावे, असे आवाहन कृषी विभागाकडून करण्यात आले आहे.