मुंबई : राज्यातून मान्सूनने अधिकृत माघार घेतली असली, तरीही वातावरण पावसाला पोषक झाले आहे. त्यामुळे पुढील काही दिवस महाराष्ट्रात पावसाची शक्यता हवामान विभागाने वर्तवली आहे. आज मुंबईसह राज्यातील तब्बल २६ जिल्ह्यांसाठी यलो अलर्ट जारी करण्यात आला असून, नागरिकांना सतर्क राहण्याचे आवाहन करण्यात आले आहे.
आज जारी केलेल्या अलर्टनुसार मुंबई शहर, मुंबई उपनगर, ठाणे, रायगड, पालघर, रत्नागिरी, सिंधुदुर्ग, नाशिक, अहमदनगर, पुणे, सातारा, सांगली, कोल्हापूर, सोलापूर, बीड, धाराशिव, लातूर, नांदेड, परभणी, हिंगोली, बुलढाणा, अकोला, अमरावती, यवतमाळ, वाशीम आणि नागपूर या जिल्ह्यांमध्ये पावसाची शक्यता वर्तवण्यात आली आहे. त्यामुळे या भागांमध्ये पुढील काही दिवस हवामानातील बदल महत्त्वाचे ठरणार आहेत.
राज्यात सध्या ऑक्टोबर हिट जाणवत असून, दुपारच्या वेळेस बाहेर पडणं नागरिकांसाठी त्रासदायक ठरत आहे. मात्र, अधूनमधून पडणाऱ्या पावसामुळे काही प्रमाणात दिलासा मिळत आहे. तसेच किमान तापमानात घट होत असल्याने पहाटेच्या सुमारास गारवा वाढू लागला आहे. काल कोकणासह मुंबईत पावसाची हलकी सर पडली. हवामान खात्याच्या अंदाजानुसार, पुढील काही दिवस पावसाची ही उघडीप कायम राहणार आहे. त्यामुळे नागरिकांनी आवश्यक ती काळजी घेण्याचे आवाहन करण्यात आले आहे.

