बीड दि. १६ (प्रतिनिधी ): राज्यातील स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांसाठी जिल्हापरिषद, पंचायत समित्यांची गट गण रचना करण्याचे आदेश राज्याच्या ग्रामविकास विभागाने दिले आहेत. त्यानुसार आता बीडचे जिल्हाधिकारी विवेक जॉन्सन यांनी प्रत्येक तालुक्यातील तहसीलदारांना गट गण रचनेचे प्रारूप तयार करण्याकरिता प्राधिकृत केले असून संबंधित उपविभागीय अधिकारी हे त्यावर पर्यवेक्षण करणार आहेत.
राज्यात स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीच्या प्रक्रियेला वेग आला आहे. जिल्हापरिषद, पंचायत समिती निवडणुकीत सर्वात महत्वाचा टप्पा हा गट गण रचनेचा असतो. याकडे सर्वांच्या नजर असतात. ही गट गण रचनेची प्रक्रिया १८ ऑगस्टपर्यंत पूर्ण करायची असून त्यासाठीचे प्रारूप १४ जुलैपर्यंत जाहीर करायचे आहे. त्यासाठी आता बीडचे जिल्हाधिकारी विवेक जॉन्सन यांनी प्रत्येक तालुक्याच्या तहसीलदारांना प्राधिकृत केले आहे. त्यांनी तातडीने गट गण रचनेचे प्रारूप तयार करण्याच्या सूचना देण्यात आलेल्या आहेत.
तहसीलदारच स्वीकारणार हरकती
गट गण रचनेचे प्रारूप प्रसिद्ध झाल्यानंतर त्यावरील आक्षेप, हरकती आणि सूचना देखील संबंधित तहसीलदारांकडे द्याव्या लागणार आहेत. हरकती आणि सूचना स्वीकारण्यासाठी देखील तहसीलदारांना प्राधिकृत करण्यात आले आहे. त्यावर जिल्हाधिकाऱ्यांमार्फत विभागीय आयुक्तांकडे प्रस्ताव जाणार असून सुनावणी आयुक्त घेणार आहेत.
असा आहे प्रभाग रचनेचा कार्यक्रम
प्रारुप प्रभागरचना: १४ जुलै पर्यंत
हरकती व सुचना : २१ जुलै
हरकतींवर आयुक्तांकडे प्रस्ताव : २८ जुलै
हरकतींवर सुनावणी : ११ ऑगस्ट
अंतीम प्रभागरचना आयोगाकडे पाठविणे : १८ ऑगस्ट
असे असतील गट गण
(कंसातील आकडे गणांचे )
आष्टी: ७ (१४ ) , पाटोदा :३ (६) , शिरुरकासार :४ (८ ) , गेवराई: ९ (१८) , माजलगाव: ६(१२ ) , वडवणी: २ (४ ) , बीड :८ (१६ ) , केज : ७ (१४ ), धारुर : ३(६ ) , परळी : ६(१२ ) , अंबाजोगाई: ६(१२ )