मुंबई : आयएएस अधिकारी तुकाराम मुंढे यांनी अन्न व औषध प्रशासनाचा पदभार स्वीकारल्यापासून राज्यभरात छापे टाकले जात आहेत. अनेक कारखान्यांमध्ये छापे टाकत भेसळ उघड केली आहे, अनेक कार्यालयांना मुंढे यांनी टाळे लावले आहेत. या कारवाईमुळे सध्या आयएएस अधिकारी तुकाराम मुंढे चर्चेत आले आहेत. दरम्यान, आज विधिमंडळात त्यांच्या बदली संदर्भात शिवसेनेचे आमदार किशोर पाटील यांनी मोठी मागणी केली. "तुकाराम मुंढे यांची निवृत्त होईपर्यंत बदली करु नये, अशी इच्छा आहे. किमान पुढील तीन वर्ष त्यांची बदली होणार नाही याबाबत उत्तर द्या", अशी मागणी पाटील यांनी केली. यावेळी मंत्री झिरवळ यांनी उत्तर दिले.
शिवसेना शिंदे गटाचे आ.किशोर पाटील यांनी आज विधिमंडळात आयएएस अधिकारी तुकाराम मुंढे यांची बदली करू नका अशी मागणी केली. अन्न व औषध प्रशासनात आयुक्त म्हणून तुकाराम मुंढे ज्या दिवसापासून आले त्या दिवसापासून खऱ्या अर्थाने या संपूर्ण महाराष्ट्रामधल्या या अवैध काम करणाऱ्या सगळ्यांचे धाबे दण आणलेले आहेत. या अधिकाऱ्यांची त्यांच्या २५ वर्षात २७ वेळा बदली झाली आहे. माझी मंत्र्यांना विनंती आहे की, त्यांना आता सुंदर विभाग मिळाला आहे, असेही आमदार पाटील म्हणाले."राज्यातील सगळ्या लहानांपासून ते आमच्या माता भगिनींपर्यंत जे आयुष्य बरबाद होणार होते. त्यापासून वाचले आहे. आता मुंढे यांना शोभून दिसेल असा विभाग मिळाला आहे. त्यांची किमान तीन वर्षे तरी बदली होऊ नये. आमची इच्छा आहे की त्यांची रिटायर्डमेंट होऊ त्यांच्याकडे तो विभाग असावा, असेही किशोर पाटील म्हणाले. यावर मंत्री झिरवळ यांनी उत्तर दिले. ते म्हणाले, बदली हा विषयच येत नाही कामकाज सुरळीत चालू आहे सुरळीत चालू राहणार आहे, असे सांगून झिरवाळ यांनी मुंढे यांच्या बदली होणार नसल्याचे स्पष्ट केले.
तुकाराम मुंढेंची राज्यभरात कारवाई
आयएएस अधिकारी तुकाराम मुंढे यांनी राज्यभरात भेसळविरोधात कारवाई केली आहे. नागपूरात दोन बेकारी उत्पादन करणाऱ्या कारखान्यांवर कारवाई केली आहे. तर सोलापूरातील एका रुग्णालयाच्या मेडिकलवर काल कारवाई केली आहे.

