मुंबई : राज्यात पावसाला दमदार सुरुवात झाली आहे. अनेक भागात शनिवारपासून पावसाचा जोर वाढला असून, पुढील २४ तासांत काही ठिकाणी अति मुसळधार ते अतिवृष्टी सदृश्य पाऊस होण्याचा अंदाज हवामान विभागाने वर्तवला आहे राज्यातील दोन जिल्ह्यांसाठी रेड अलर्ट, तर काही जिल्ह्यांसाठी ऑरेंज अलर्ट जारी केला आहे.
कोकणातील काही ठिकाणी पुढील २४ तासांत अतिमुसळधार ते अत्यंत मुसळधार पाऊस पडण्याचा अंदाज व्यक्त करण्यात आला आहे. गोवा आणि दक्षिण कोकण, त्याचबरोबर उत्तर कोकणात अतिमुसळधार पावसाची शक्यता असून हवामान विभागाने रेड अलर्ट दिला आहे.पालघर, मुंबई, ठाणे, नाशिक जिल्ह्यातील काही भागात मुसळधार पाऊस होण्याचा अंदाज आहे. या भागांनाही यलो अलर्ट देण्यात आला आहे.
पुणे, सातारा, कोल्हापूरला ऑरेंज अलर्ट
पुणे घाट परिसर, सातारा घाट परिसर, कोल्हापूर घाट परिसरात पावसाचा जोर कायम राहणार आहे. सिंधुदुर्ग, पुणे जिल्ह्याचा काही भाग, सातारा जिल्ह्याचा काही भाग आणि कोल्हापूर जिल्ह्यातील काही भागांना ऑरेंज अलर्ट देण्यात आला आहे.
ऑरेंज अलर्ट देण्यात आलेल्या जिल्ह्यांतील काही भागांत मुसळधार ते अतिमुसळधार पावसाची शक्यता आहे. काही ठिकाणी विजांच्या कडकडाटासह वादळी वारे वाहतील, असे हवामान विभागाने म्हटले आहे.
मराठवाडा, विदर्भ हवामान अंदाज काय?
मराठवाड्यातील काही जिल्हे आणि विदर्भातील सर्वच जिल्ह्यांमध्ये काही ठिकाणी मुसळधार पाऊस पडण्याचा अंदाज वर्तवण्यात आला आहे. काही ठिकाणी विजांच्या कडकडाटासह पाऊस होण्याचा अंदाज आहे.