मुंबई : राज्यात गेल्या दोन तीन दिवसांपासून काही भागात मुसळधार ते अतिमुसळधार पाऊस पडत आहे. वादळी वारे आणि वीजांच्या कडकडाटासह पावसाने हजेरी लावलीय. कोकण आणि मध्य महाराष्ट्रात(Maharashtr rain) ६४ मंडळात अतिवृष्टी झाली तर अनेक ठिकाणी हलक्या ते मध्यम सरी कोसळल्या.
मान्सून लवकर दाखल झाल्यानंतर पावसाने विश्रांती घेतली होती. महिन्याच्या तिसऱ्या आणि चौथ्या आठवड्यात जोरदार पाऊस झाला होता. यामुळं पिकांचं नुकसान झालं होतं. तर कोरडवाहू भागात मशागत आणि पेरण्या खोळंबल्या आहेत. आता पुन्हा येत्या २-३ दिवसात काही भागात मुसळधार पावसाचा इशारा देण्यात आल्यानं शेतकरी चिंतेत आहेत.हवामान विभागाने येत्या २४ तासात कोकणसह मध्य महाराष्ट्रात मुसळधार पावसाचा इशारा दिला आहे. कोकणात रेड अलर्ट आणि मध्य महाराष्ट्रात ऑरेंज अलर्ट जारी करण्यात आलाय. रायगड, रत्नागिरी जिल्ह्यांना रेड अलर्ट देण्यात आला आहे. तर मुंबई, ठाणे, सिंधुदुर्ग, पुणे, सातारा घाटमाथा, कोल्हापूर घाटमाथ्यावर आज जोरदार पावसाची शक्यता आहे.
पुणे जिल्ह्यात शनिवारी वीजांच्या कडकडाटासह आणि वादळी वाऱ्यासह मुसळधार पावसाचा इशारा देण्यात आला आहे. घाटमाथा परिसरात जोरदार पावसाची शक्यता असून जिल्ह्याला ऑरेंज अलर्ट देण्यात आला आहे.
मान्सून येत्या दोन दिवसात विदर्भाच्या काही भागात, छत्तसीगढ आणि ओडिशात पुढे सरकण्यासाठी पोषक वातावऱण निर्माण झालंय. मान्सूनच्या पुढील वाटचालीसाठी अनुकूल अशी स्थिती निर्माण होण्याची शक्यता हवामान विभागाने वर्तवली आहे.