अमरावती : शेतकऱ्यांच्या प्रश्नांवर गेल्या ८ जूनपासून प्रहार जनशक्ती पक्षाचे अध्यक्ष बच्चू कडू (bacchu kadu) यांनी बेमुदत अन्नत्याग आंदोलन सुरू केले आहे. उपोषणाच्या सहाव्या दिवशी मृद व जलसंधारण मंत्री संजय राठोड यांनी गुरूकूंज मोझरी येथे उपोषणस्थळी भेट दिली. यावेळी त्यांनी बच्चू कडू यांना उपोषण मागे घेण्याची विनंती केली, पण ती धुडकावून कडू यांनी जोपर्यंत मागण्या पूर्ण होत नाही, तोपर्यंत मागे हटणार नाही, असा निर्धार व्यक्त केला.
बच्चू कडू (bacchu kadu) म्हणाले, संजय राठोड (sanjay rathod) यांनी जी सहानुभूती दाखवली त्याचा मी आदर करतो. मात्र, शेतकरी, शेतमजुरांसोबत आम्ही विश्वासघात करू शकत नाही. मागण्यांवर एकत्र निर्णय घ्या नाही तर आमची अंत्ययात्रा काढा, तशी व्यवस्था करा. या दोन्ही पैकी काही जरी केले तरी ते आम्हाला मान्य आहे. आम्ही कर्त्यव्यात कुठेही कसूर करणार नाही. रोज १५ ते २० शेतकरी आत्महत्या करत असल्याचे बच्चू कडू यांनी सांगितले.
यावेळी संजय राठोड (sanjay rathod) म्हणाले, बच्चू कडू यांनी सहा दिवसापासून अन्नत्याग आंदोलन सुरु केले आहे. आज त्यांची भेट घेत त्यांना उपोषण सोडण्याची विनंती केली. आज त्यांना उलटी झाली. त्याची प्रकृतीची काळजी आम्हा सर्वाना आहे. महिन्यातील दर मंगळवारी कॅबिनेट बैठक होते. त्यामध्ये आपल्या मागण्यांचा विषय मी विशेष म्हणून मांडणार आहे.