धाराशिव दि.१३ (प्रतिनिधी):जिल्ह्याच्या सन २०२४ -२५ च्या जिल्हा वार्षिक योजनेतील सर्वसाधारण (सर्व विभाग) निधीच्या वितरणासंदर्भात स्थानिक विकासकामे तातडीने पूर्ण करण्यासाठी आवश्यक निर्णय प्रक्रियेत असून,लवकरच संबंधित यंत्रणांना मार्गदर्शन केले जाणार आहे.अशी माहिती परिवहन तथा पालकमंत्री प्रताप सरनाईक यांनी दिली.
मंत्री सरनाईक म्हणाले की, या निधीविषयक निर्णयासाठी जानेवारी २०२५ मध्ये झालेल्या जिल्हा नियोजन समितीच्या बैठकीत सर्व सदस्यांनी एकमुखाने निधीचे स्थानिक स्वरूपात वितरण करण्यावर भर दिला होता.मात्र,काही तांत्रिक कारणांमुळे निधी वितरणाला विलंब झाला.यासंदर्भात स्थानिक आमदार, लोकप्रतिनिधी आणि विभागीय पदाधिकाऱ्यांनी अनेक वेळा पाठपुरावा केला होता. या अनुषंगाने मी स्वतः देखील पत्र पाठवून मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना निधी बाबत स्थगिती उठण्याची विनंती केली होती. त्यांनी त्यावर सकारात्मक प्रतिसाद दिला आहे.धाराशिव हा आकांक्षीत जिल्हा (Aspirational District) असल्यामुळे जिल्ह्यातील आरोग्य, शिक्षण,महिला व बालकल्याण, जलसंधारण इत्यादी विविध विभागांशी संबंधित मूलभूत सुविधांची कामे आणि अन्य विकासकामे तातडीने पूर्ण होणे गरजेचे आहे.त्यामुळे निधी वितरणाबाबत लवकरच स्पष्टता येईल व योजनांची अंमलबजावणी गतीने होईल.त्यामुळे विकासाला चालना मिळेल.
उपमुख्यमंत्री (वित्त व नियोजन) यांच्याकडे निधी वितरण संदर्भातील प्रस्ताव पाठवण्यात आला असून, लवकरच यासंदर्भात निर्णय अपेक्षित आहे.तत्पूर्वी,जिल्हा नियोजन समितीच्या योजनेतील सर्वसाधारण कामांबाबत स्थानिक स्वराज्य संस्थांनी प्रस्ताव सादर करावेत,असे आवाहन पालकमंत्री सरनाईक यांनी केले आहे.
जिल्ह्याच्या सर्वांगीण विकासासाठी निधी वितरणाचा निर्णय लवकरच घेण्यात येईल आणि प्रलंबित कामे सुरू होण्यासाठी शासन सर्वतोपरी प्रयत्नशील आहे. असे प्रतिपादन पालकमंत्री प्रताप सरनाईक यांनी केले आहे.