Advertisement

अथक,अविश्रांत..लाखोंची गर्दी पण नेकनूर पोलिसांचे तितकेच चोख नियोजन

प्रजापत्र | Wednesday, 11/06/2025
बातमी शेअर करा

समीर लव्हारे
बीड दि.१०-यात्रा,सप्ताह,महोत्सव असे काही असले म्हणजे खरे काम वाढते ते पोलिसांचे.त्यातही प्रदीप मिश्रांसारख्या व्यक्तीची कथा म्हणजे साहजिकच लाखोंचा जनसागर येणार,त्यातही येणारांमध्ये ज्येष्ठ नागरिक आणि महिलांची संख्या जास्त,त्यामुळे त्या सर्वांची सुरक्षितता,जोडीला वाहतुकीचे नियोजन आणि पुन्हा कोठेही गोंधळ निर्माण होऊ न देणे, ही सारी कसरत करायची तर ना थकता येते, ना विश्रांती घेता येते... बरे हे काही केवळ एक दिवस करायचे नाही,तर कथा सुरु होण्याच्या कितीतरी दिवस अगोदरपासून आणि आता कथेचे दिवस,पोलिसांसाठी रोज नवे आव्हान.नेकनूर पोलीस ठाण्याचे सहाय्यक पोलीस निरीक्षक चंद्रकांत गोसावी आणि त्यांची सारी टीम हे आव्हान न थकता पेलत आहे.

   बीड जिल्हा कायदा सुव्यवस्थेच्या दृष्टीने तसा संवेदनशील.त्यामुळे येथे पोलिसांवरील कामाचा व्याप देखील तितकाच मोठा.पोलिसांना त्यांची रोजची कामे पार पाडतानाच नाकी नऊ यावेत अशी परिस्थिती.त्यात पुन्हा काही राजकीय कार्यक्रम,महत्वाच्या व्यक्तींचे दौरे,आंदोलने हे सारे आलेच.हे सारे पार पडायचे तर कमालीचा संयम लागतो.बीड जिल्ह्यात कर्तव्य बजावताना अधिकारी,कर्मचाऱ्यांमध्ये हा संयम येतोच येतो.नेकनूरचे ठाणेप्रमुख चंद्रकांत गोसावी आणि त्यांची सारीच टीम सध्या याच संयमाचा अनुभव घेत असतील.
नेकनूर पोलीस ठाणे मुळातच जिल्ह्यातील काही मोजक्या 'हॉट' म्हणता येतील अशा ठाण्यांपैकी एक.बहुतांश गावे बीड तालुक्यातील,तर काही गावे थेट केज मतदारसंघातली.त्यातच या पोलीस ठाण्यांतर्गत येणाऱ्या चाकरवाडी येथे प्रदीप मिश्रांच्या शिवपुराण कथेचे आयोजन झाले आणि पोलिसांसाठी हा परीक्षेचा काळ सुरु झाला आहे. जेथे लाखो लोक येणार आणि छोट्यातल्या छोट्या चुकीलाही संधी नाही, अशा कार्यक्रमाच्या सुरक्षा व्यवस्थेचे नियोजन आणि इतरही साऱ्या बाबी सांभाळणे म्हणजे मोठे आव्हान. बंदोबस्तासाठी येणाऱ्या पथकाला फक्त कथेचे ७ दिवस सांभाळायचे, पण स्थानिक पोलिसांना तसे नाही. कार्यक्रमाच्या अगोदरपासून रोजच्या भेटी, नियोजनातील बारकावे स्वतः डोळ्याखालून घालायचे, कोठे अडचणी येऊ शकतात, कोणाचे रागलोभ कसे असतील, वाहतुकीचे काय? कोणत्या भागात गर्दी झाली तर काय,स्थानिक आणि बाहेरचे भक्त,त्यांची सांगड कशी घालायची ? ऐनवेळी काय परिस्थिती उदभवेल ते सांगता येत नाही. दोन दिवसांपूर्वीच अचानक पाऊस आला आणि गाड्या फसल्या, ऐनवेळी जेसीबी मागवून गाड्या काढाव्या लागल्या. हा झाला एक प्रसंग, मात्र मागच्या महिनाभरापासून या कथेच्या नियोजनात नेकनूरचे ठाणेप्रमुख चंद्रकांत गोसावी आणि त्यांची सारी टीम न थकता,डोळ्यात तेल घालून झटते आहे.इतरवेळी पोलीस कोठे कमी पडले तर लगेच टीका होते,मात्र पोलीस ज्यावेळी अथक,अविश्रांत परिश्रम करतात,आपली व्यक्तिगत कामे बाजूला ठेवून,वेळेचा विचार न करता रात्रंदिवस उभे असतात,त्याचवेळी असे मोठमोठे कार्यक्रम निर्विघ्न होत असतात, त्याचीही कोठेतरी दखल घेतली जावी यासाठीच हा शब्दप्रपंच.

Advertisement

Advertisement