२६ वर्षाच्या वाटचालीत पक्षाची पडलेली दोन शकले, स्वतः शरद पवारांना गमवावी लागलेली पक्षाची धुरा , मुळातच 'लीडर'बेस असलेल्या पक्षाचे अधिकाधिक नेताकेंद्री होणे, आणि अधिकाधिक महाराष्ट्रवादी होणे हा राष्ट्रवादीचा प्रवास आहे. आता मूळची (जी आता अजित पवारांकडे आहे) राष्ट्रवादी असेल किंवा राष्ट्रवादी शरदचंद्र पवार नावाची नवी तडजोड, या पक्षांना सत्तेशिवाय चैन पडत नाही हे जितके खरे आहे तितकेच हे दोन्ही पक्ष , तसे एकाच जातकुळीतले असल्याने कधी काय करतील याचाही भरवसा देता येत नाही. या २६ वर्षात राष्ट्रवादीबद्दल खरोखर काय घडले असेल तर या पक्षांचे 'मोस्ट अनप्रिडीक्टेबल ' असणे अधिकच वाढले आहे.
----
१९९९ ला ज्यावेळी शरद पवारांनी काँग्रेसमधून बाजूला होत राष्ट्रवादी काँग्रेसची स्थापना केली होती, खरेतर तेव्हाही शरद पवारांच्या या भूमिकेचे गूढ अनेकांना उकलले नव्हते आणि आज २६ वर्षांनी जेव्हा दोन्ही राष्ट्रवादीच्या एकीकरणाचा चर्चा होते , त्यावेळी कधी 'सुप्रिया सुळेंनी निर्णय घ्यायचाय ' असे किंवा 'मला माहीत नाही ' असे जेव्हा शरद पवार म्हणतात , त्यावेळी आजही शरद पवार आणि त्यांची राष्ट्रवादी 'मोस्ट अनप्रिडीक्टेबल' ठरते हेच खरे. मुळात राष्ट्रवादीच्या स्थापनेवेळी शरद पवारांनी काहीही सांगितले असेल, किंवा कितीही तत्वाच्या गोष्टी केल्या असतील, मात्र त्यांना त्यावेळी पंतप्रधानपद खुणावत होते , आणि सोनियांच्या काँग्रेसमध्ये राहून ते शक्य होणार नाही याची जाणीव असल्यानेच, किमान सोनियांना त्या पदापासून दूर ठेवता यावे यासाठीच त्यांनी विदेशीपणाचा मुद्दा समोर आणला होता हे लपून राहिलेले नाही. कारण तसे नसते तर तर लगेच महाराष्ट्रात त्यांचा पक्ष सोनियांच्या काँग्रेससोबत सत्तेत रमला नसता आणि पुढे २००४ मध्ये एक दशकभर स्वतः शरद पवार देखील संपुआच्या सरकारमध्ये बसले नसते.
ममूलतच राजकारणातली शरद पवारांइतकी स्थितिस्थापकता किंवा फारच सोप्याभाषेत सांगायचे तर लवचिकता इतर कोणत्या नेत्यांमध्ये अभावानेच आढळेल. सत्तेसाठी कधी वसंतदादांची साथ सोडून अगदी जनसंघ , समाजवाद्यांच्या हात धरण्याची त्यांची कृती असेल किंवा इंदिरा गांधींना विरोध म्हणून काढलेल्या पक्षाचे पुढे राजीव गांधींच्या उपस्थितीत काँग्रेसमध्ये केलेले विलीनीकरण असेल , सत्तेच्या सूर्याला नमस्कार करणे म्हणजे राजकारण हे महाराष्ट्राला शरद पवारांइतके स्पष्ट कोणीच सांगितले नाही. मुळातच शरद पवार काय किंवा त्यांचे समर्थक म्हणविणारे नेते काय , त्यांना विरोधात राहण्याची फारशी सवय कधीच नव्हती. आणीबाणी नंतरच्या काळात शरद पवार काही काळ विरोधी पक्षात होते, पण काही काळच , आणि तो काळ देखील किमान काही राजकीय निष्ठा पाळणारा होता, म्हणून असेल कदाचित, पण तो कालखंड आणि नंतरच्या काळातला महाराष्ट्रातील युती सरकारचा (९५-९९ ) हा कालखंड सोडला तर शरद पवार आणि सत्ता हे समीकरण दीर्घकाळ , अगदी २०१४ पर्यंत कायम राहिले होते. त्यामुळेच शरद पवारांना आणि त्यांच्या राष्ट्रवादीला कायम सत्ता हवी असते, किमान सत्तेची सावली म्हणा किंवा सत्तेच्या गुडबुकमध्ये तरी राहायला हवे असते . ज्यावेळी थेट सत्ता मिळण्याची श्यक्यता नसते त्यावेळी ते सत्तेच्या गुडबुकमध्ये राहणे पसंत करतात , आणि ज्यावेळी सत्ता मिळण्याची थोडी जरी शक्यता असेल त्यावेळी त्यासाठी 'काहीही ' करण्याची त्यांची तयारी असते. याला राजकारणातली शरद पवारांची 'जबर इच्छाशक्ती ' असेही म्हणता येईल , पण हा प्रवास सत्तेसाठीच असतो हे मात्र निश्चित. राष्ट्रवादीच्या २६ वर्षाच्या प्रवासात हेच सातत्याने अनुभवायला आले आहे. बाकी विचारधारा , हिंदुत्व विरोध, धर्मनिरपेक्षता किंवा यशवंतरावांचा , फुले शाहू आंबेडकरांचा विचार हे सारे त्या त्या वेळचे किंवा दाखवायचे दात असतात , तसे नसते तर गुजरात दंगलीनंतर ज्यावेळी तत्कालीन मुख्यमंत्री नरेंद्र मोदींविरोधात कठोर कारवाईच्या हालचाली तत्कालीन केंद्र सरकारने सुरु केल्या होत्या, त्याला शरद पवार यांनी खोडा घातलाच नसता किंवा अगदी २०१४ मध्ये महाराष्ट्रात भाजपच्या सरकारला बाहेरून पाठिंबा देण्याची भाषा केलीच नसती. त्यानंतरही पहाटेचा शपथविधी असेल किंवा आता अगदी अजित पवारांचे बंड , या साऱ्यांमध्ये शरद पवारांची नेमकी भूमिका किती आणि काय हे छातीठोकपणे स्वतः सुप्रिया सुळे तरी सांगू शकतील का हा प्रश्नच आहे.
आणि म्हणूनच असेल कदाचित, मूळचाच लीडरबेस असलेल्या राष्ट्रवादीमध्ये, अगदी राष्ट्रवादी शरदचंद्र पवार पक्षातही , काही अपवाद वगळले तर अनेकांना अजित पवारांसोबत सत्तेत जायचेच आहे.जे जायला नको म्हणतात , त्यातही काहींची मतदारसंघातील सामाजिक समीकरणांनी तर काहींची इथले मोठेपण तिथे मिळेल का ? या प्रश्नाने गोची केलेली आहे. बाकी हे प्रश्न सुटले तर दोन्ही राष्ट्रवादी पुन्हा एकदा एकत्र यायला फारशी काही कोणत्या विचारधारा वगैरेची अडचण आहे असे नाही. कारण मुळातच शरद पवारांनीच आपल्या नेत्यांमध्ये सत्ताकेंद्रीपण इतके बिंबवलेले आहे की, त्यांना सत्तेशिवाय राहणे जड जाते. मागच्या २६ वर्षातही दीर्घकाळ कोणत्या ना कोणत्या माध्यमातून सत्तेच्या सहवासातच राष्ट्रवादी वाढली आहे. आज या पक्षाची दोन शकले पडली असली तरी हे दोन पक्ष एकमेकांचे विरोधक नाहीत. 'पवार ' म्हणून सारे एक कसे आहेत हे स्वतः शरद पवार आणि अजित पवारांनी अनेकवेळा सांगितले आहेच, त्यामुळे उद्या अमुक असे होणारच नाही असे कोणी सांगू शकणार नाही. मागच्या २६ वर्षात देशव्यापी प्रतिमेवरुन हा पक्ष दोन शकले झालेला झालेला महाराष्ट्रवादी झाला , कोणी शिवसेनेसोबत तर कोणी थेट भाजपसोबत जाऊन राजकारणात काहीही होऊ शकते हे या पक्षाने दाखवून दिले . त्यामुळे या २६ वर्षात या पक्षाने एकच कोणती गोष्ट जपली असेल तर ती म्हणजे पक्षाचे, पक्षाच्या नेत्यांचे 'मोस्ट अनप्रिडीक्टेबल 'असणे. आता त्याच वाटेवरून जाताना , या पक्षाला कोणती वळणे घ्यावी लागतात आणि अनेक नेते आणि कार्यकर्ते स्वप्न पाहतात ती एकीकरणाची 'हीच ती वेळ ' खरोखर येते का यावर राज्यातील बरीच समीकरणे अवलंबून असतील.

बातमी शेअर करा