Advertisement

महाराष्ट्रात धो- धो पाऊस ३५ वर्षांचा विक्रम मोडला

प्रजापत्र | Monday, 26/05/2025
बातमी शेअर करा

मुंबई :मान्सूनने मे महिन्यातच एंट्री घेत संपूर्ण महाराष्ट्रात धूमशान घालायला (Maharashtra Rains)सुरुवात केली. राज्यात रविवारी (२५ मे २०२५) पहाटेपासून पावसाला सुरुवात झाली. मान्सून यंदा १२ दिवस आधीच राज्यात दाखल झाला.  दरम्यान, ३५ वर्षानंतर पहिल्यांदाच मे महिन्यात मान्सून राज्यात दाखल झाला. हा एक विक्रम आहे. याआधी २० मे १९९० साली राज्यात वेळेआधीच मान्सून दाखल झाला होता 

भारतीय हवामानशास्त्र विभागाने दिलेल्या माहितीनुसार, मुंबईत मान्सूनपूर्व मुसळधार पाऊस पडला. मे महिन्यात शहरात ७३६ टक्के पाऊस झाला. तसेच या आठवड्यात आणखी मुसळधार पाऊस पडण्याची शक्यता वर्तवण्यात आली. खबरदारीचा उपाय म्हणून राज्यात यलो अलर्ट जारी करण्यात आला.

 

मुसळधार पावसामुळे जनजीवन विस्कळीत
दरम्यान, सोमवारी सकाळी झालेल्या मुसळधार पावसामुळे मुंबईतील जनजीवन विस्कळीत झाले. पावसामुळे रुळांवर पाणी साचल्याने मध्य, हार्बर आणि पश्चिम रेल्वेची वाहतूक विस्कळीत झाली असून लोकल गाड्या नियोजित वेळेपेक्षा ५ ते १० मिनिटे उशिराने धावत आहेत. सखल भागातील रस्ते पाण्याखाली गेल्याने नागरिकांना अनेक समस्यांना तोंड द्यावे लागत आहे. याच पार्श्वभूमीवर मुंबई महानगरपालिकेने आवश्यक नसल्यास घराबाहेर पडू नये, असे नागरिकांना आवाहन केले.

 

मुंबईतील ९६ इमारती धोकादायक
मुंबई महानगरपालिकेतील ९६ इमारतींना असुरक्षित म्हणून घोषित करण्यात आले. खबरदारी म्हणून सुमारे ३,१०० रहिवाशांचे तात्पुरते स्थलांतरित करण्यात आले. यावर्षी सरासरीपेक्षा १०५ टक्के पाऊस पडेल अशी शक्यता हवामान विभागाकडून आधीच सांगण्यात आले.

 

राज्यात बहुतांश भागात अतिवृष्टीची शक्यता
राज्यात २६ मे ते ३१ मे पर्यंत हवेचे कमी दाबाचे क्षेत्र तयार होत आहेत. हवेचा दाब ९९८ ते १००० इतका आहे. त्यामुळे महाराष्ट्रात बऱ्याच भागात अतिवृष्टी होण्याची शक्यता आहे. पावसाचा जोर प्रचंड राहील. शिवाय सध्या पोषक वातावरण असल्यामुळे संपूर्ण राज्य दोन ते तीन दिवसात मोसमी पाऊस व्यापेल. तसेच महाराष्ट्रात हवाचे दाब कमी झाला आहे. त्यामुळे जूनमध्ये पाऊस कायम राहणार आहे, अशी शक्यता हवामान तज्ज्ञ डॉ. रामचंद्र साबळे यांनी वर्तवली आहे.

Advertisement

Advertisement