Advertisement

कोरोनामूळे शाळेतल्या भिंतीही झाल्या अबोल.

प्रजापत्र | Wednesday, 23/09/2020
बातमी शेअर करा

बीड : शाळेतील इमारतीच्या भिंतीवरील इतिहासातील घडामोडीचे चित्ररूपी वर्णन, नकाशातून सूचित केलेले  राज्य, देश, स्वातंत्र्य लढ्यातील एखाद्या घटनेचे वर्णन करणारे चित्र, नकाशाच्या माध्यमातून घडणारी जगाची भ्रमंती तसेच आकड्याच्या मदतीने गणित सोपे करून सांगणारे फलक, यामुळे शाळेच्या भिंती जणू विध्यार्थ्यांशी संवाद साधायच्या. मात्र कोरोनामुळे शाळा बंद झाल्या आणि विध्यार्थी घरात असल्याने शाळेच्या परिसरात सन्नाटा पसरला आहे. पाच महिन्यांपासून बोलक्या भिंतीही अबोल झाल्या आहेत. कोरोना विषाणूच्या संसर्गाच्या पार्श्वभूमीवर २२ मार्च पासून लॉकडाऊन झाले. गावातील शाळा बंद आहेत परिणामी शाळेतील किलबिलाट थांबली आहे. मुलांच्या एकसुरातील आवाजामुळे दमदमून जाणारा शाळेचा परिसर अबोल झाला आहे. दरवर्षी जून नंतर शाळेची चाहूल लागते. शाळा सुरु होताच मुले शिक्षक, व शाळेचे नाते अधिक घट्ट होत असते शाळा, शिक्षकांच्या प्रभोधनातून संस्कारातून मुलांचे व्यक्तिमत्व घडत असते. यामध्ये विविध विषयांच्या  माहितीने शाळेच्या सजवलेल्या भिंतींचेही योगदान असते. लोकजीवन व इतर माहिती व्यवहारातून आकडेमोड करताना उपयोगी पडणारे पाढे इतर गणितीय माहिती, हे करा ते करू नका असा सल्ला देणारे संदेश या बाबी आयुष्यभरासाठी ज्ञानाची शिदोरी देत असतात. म्हणून प्रत्येक शाळेतल्या प्रत्येक विध्यार्त्याला  या भिंती बोलक्या वाटतात. येता जाताना सतत मुले या भिंती न्याहाळत असतात. मात्र  सध्या कोरोनाच्या संसर्गामुळे शाळा बंद आहेत. त्यामुळे शाळा सुरु असताना विद्यार्थ्यांशी घट्ट मैत्री जमविणाऱ्या शाळेच्या बोलक्या भिंती अबोल झाल्या आहेत. अध्ययन सार्थ व सुस्पष्ट करण्यासाठी चित्रे व साधनांची अधिक मदत होते. सचित्र कथेतील अधितकतर तपशील दीर्घतर कालावधी पर्यंत मुलांच्या लक्षात राहतो. अध्यापनात चित्रांचा व फलकांचा वापर केल्यास विषयांचा बोध चांगला होतो. त्यामुळे शाळेच्या भिंतीवरील चित्र अधिक बोलके वाटतात.  दरम्यान पाच महिन्यापासून विध्यार्थी कोरोनामुळे शाळेतच येत नसल्याने शाळेच्या बोलक्या भिंती अबोल बनल्या आहेत.    

Advertisement

Advertisement