Advertisement

 बीड जिल्हयात रेमडेसिवर आणि कोरोना लसीचा तुटवडा-पंकजा मुंडे 

प्रजापत्र | Friday, 16/04/2021
बातमी शेअर करा

 मुंबई । दि. १६- बीड जिल्हयात कोरोनाची स्थिती गंभीर बनली असताना रेमडेसिवर आणि कोरोना लसींचा मोठया प्रमाणावर तुटवडा जाणवत आहे. अशातच राज्य सरकारने बीडला केवळ २० डोस दिले आहेत, यासंदर्भात भाजपच्या राष्ट्रीय सचिव पंकजा मुंडे यांनी आरोग्यमंत्र्यांना पत्र पाठवून खेद व्यक्त केला आहे. दरम्यान, बीडच्या सत्ताधाऱ्यांना  फक्त माफियांचं हित माहित आहे, जनतेच्या हितासाठी आम्ही लढण्यास तयार आहोत असेही त्यांनी म्हटले आहे.

 

 

सध्या कोरोना रुग्णांची संख्या दिवसेंदिवस वाढत असून बीडमध्ये परिस्थिती चिंताजनक बनली आहे. आरोग्य विभागाच्या अहवालानुसार जिल्हयात आतापर्यंत ७२९ कोरोना पॉझिटिव्ह रूग्णांचा मृत्यू झाला आहे तर बाधितांची संख्या ३५ हजाराच्या आसपास गेली आहे.  एकीकडे आरोग्य यंत्रणा पुर्ण ताकदीने रूग्णांना मदत करण्यासाठी अहोरात्र काम करत असताना दुसरीकडे कोरोना रूग्णांसाठी लागणाऱ्या रेमडेसिवरचा तुटवडा मोठ्या प्रमाणात जाणवत आहे, रूग्ण व त्यांच्या नातेवाईकांना यामुळे फार मनस्ताप सहन करावा लागत आहे. लस देखील पुरेशा प्रमाणात उपलब्ध नसल्याने लसीकरण केंद्र बंद पडली आहेत. एकूणच या प्रकाराने रूग्णसंख्या वाढीत भर पडत आहे.

 

 

लसीचे केवळ २० डोस ; पालकमंत्र्यांचं लक्ष कुठयं ?

 

 केंद्र सरकारकडून महाराष्ट्राला आलेल्या २ लाख डोसेस पैकी बीडला इतर जिल्हयाच्या तुलनेत केवळ २० लसी मिळाल्या आहेत, ही अतिशय खेदजनक बाब असून पालकमंत्र्यांचं लक्ष कुठयं? असा सवाल पंकजा मुंडे यांनी केला आहे. याकडे आपण गांभिर्याने लक्ष घालून पुरेसे डोसेस आणि इंजेक्शन  उपलब्ध करून द्यावेत अशी मागणी त्यांनी आरोग्यमंत्री राजेश टोपे यांचेकडे पत्राद्वारे केली आहे.

Advertisement

Advertisement