आष्टी दि.२०(प्रतिनिधी): कड्यावरून अहिल्यानगरच्या दिशेने वेगाने जाणाऱ्या एका कारने समोरून कड्याच्या दिशेने येत असलेल्या दोन वेगवेगळ्या दुचाकींना जोरदार धडक दिली.दुचाकींवरील चार जण गंभीर जखमी झाले आहेत.
कडा येथील रहिवासी असलेले आदित्य किसन शिरोळे (वय २१ ) आणि त्याचा सख्खा लहान भाऊ अभिषेक किसन शिरोळे (वय १९) हे दोघे सोमवारी सकाळी नेहमीप्रमाणे आपल्या एम.एच १७, आर. ९४२० (एमएच १७ आर ९४२०) क्रमांकाच्या दुचाकीवरून पिण्याच्या पाण्याच्या प्लांट कंपनीत कामावर जाण्यासाठी निघाले होते. त्याच वेळी साबलखेड येथील रहिवासी विनायक देसाई (वय ४०) हे आपला ११ वर्षांचा लहान मुलगा संकेत विनायक देसाई याला एम.एच ०६, बी.के. २३८३ (एमएच ०६ बीके २३८३) क्रमांकाच्या दुचाकीवरून कडा येथील शाळेत सोडण्यासाठी जात होते.हे चारही जण कर्डिले वस्तीजवळ आले असता, कड्याकडून अहिल्यानगरकडे वेगाने गतीने जाणाऱ्या कार क्रमांक एम.एच १२, जे.सी. १०८७ वरील चालकाचे अचानक नियंत्रण सुटले. नियंत्रण सुटलेली ही कार महामार्गाच्या दुसऱ्या बाजूला घुसली आणि तिने या दोन्ही दुचाकींना समोरून जोरदार उडवले. या भीषण धडकेत कारचा दर्शनी भाग चक्काचूर झाला असून चारही जखमींना स्थानिक नागरिकांनी तातडीने कडा येथील ग्रामीण रुग्णालयात दाखल केले.

